गांधीनगर दि.२८ :- दुष्काळग्रस्त मराठवाड्यात पाण्याची समस्या आहे. नदी जोड प्रकल्प प्रकल्प, मराठवाडा वॉटर ग्रीड आणि कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी याचा योग्य तो वापर यासाठी करण्यास केंद्राकडून मदत मिळावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.
अहमदाबाद येथील गांधीनगर येथे पश्चिम क्षेत्रीय परिषदेच्या २६ व्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह हे होते. बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच गुजरात आणि गोव्याचे मुख्यमंत्री आणि दादरा व नगर हवेली, दमण आणि दीव या केंद्रशासित राज्याचे प्रशासक, मुख्य सचिव मनोज सौनिक उपस्थित होते.
तमराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणीही मुख्यमंत्र शिंदे यांनी केली. तिलारी सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी गोवा राज्यासोबत समन्वयाने काम करत असून गोव्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठकही झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्य शासन डहाणू ते सिंधुदुर्गपर्यंत पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी किनारी मार्ग तयार करत आहे. गोवा आणि गुजरात राज्यांशी हा मार्ग जोडला गेला तर निश्चितच या राज्यात पर्यटन मोठ्या प्रमाणावर वाढेल त्याचप्रमाणे सागरी किनारा सुरक्षेच्या दृष्टीनेही फायदा होईल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.