सामाजिक

कामगारांचा मुंबईत एल्गार! न्याय्य हक्कासाठी भारतीय मजदूर संघाचा ‘आक्रोश मोर्चा’

सचिन शिंदे

मुंबई: महाराष्ट्रातील कंत्राटी कामगारांना ‘हरियाणा पॅटर्न’ लागू करावा आणि प्रलंबित मागण्या तत्काळ सोडवाव्यात, या प्रमुख मागणीसाठी भारतीय मजदूर संघ, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने आज मुंबईतील वांद्रे येथील कामगार आयुक्तालयावर भव्य ‘आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. या मोर्चात राज्यातील विविध क्षेत्रांतील सुमारे १० हजार कामगार सहभागी झाले होते.

कामगार मंत्र्यांशी सकारात्मक चर्चा
मोर्चाच्या तीव्रतेची दखल घेत राज्याचे कामगार मंत्री ना. श्री. आकाशजी फुंडकर यांनी शिष्टमंडळाची भेट घेतली. कामगारांच्या प्रश्नांवर लवकरच संबंधित मंत्र्यांसोबत मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत बैठक घेऊन प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन मंत्र्यांनी यावेळी दिले.

प्रमुख मागण्या:
भारतीय मजदूर संघाने प्रशासनाला ३२ मागण्यांचे निवेदन सादर केले. त्यातील काही प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत:

हरियाणा पॅटर्न: कंत्राटी कामगारांना कंत्राटदारमुक्त सेवेसाठी हरियाणा राज्याच्या धर्तीवर धोरण लागू करणे.

कामगार धोरण: कृषी, आरोग्य, शिक्षण आणि उद्योग क्षेत्राप्रमाणे महाराष्ट्रात स्वतंत्र कामगार धोरण तयार करणे.
आरोग्य सुविधा: प्रत्येक जिल्ह्यात कामगार राज्य रुग्णालय (ESI) सुरू करणे.

पेन्शन व मानधन: राज्यातील EPS ९५ पेन्शनधारकांना राज्य सरकारकडून दरमहा ३००० रुपये मिळावेत. तसेच आशा व अंगणवाडी सेविकांना कर्मचारी दर्जा देण्यात यावा.

बँकिंग: बँकांना ५ दिवसांचा आठवडा लागू करावा.
चौकशीची मागणी: बांधकाम कामगार मंडळातील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी व्हावी.

बिहारमध्ये भाजपच्या ऐतिहासिक विजयाचे महानायक: विनोद तावडे यांची ‘चाणक्य’ नीती यशस्वी!

सरकारला आंदोलनाचा इशारा
यावेळी मार्गदर्शन करताना भारतीय मजदूर संघाचे अखिल भारतीय महामंत्री श्री. सुरेंद्रजी पांडे म्हणाले की, “राज्य सरकारने कामगारांच्या प्रश्नावर संवेदनशील राहणे आवश्यक आहे. सरकारने वेळोवेळी लक्ष न दिल्यास हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल.”

प्रदेशाध्यक्ष ॲड. अनिल डुमणे यांनी नमूद केले की, राज्यातील कामगारांचे प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून सरकार सातत्याने त्याकडे दुर्लक्ष करत आहे, म्हणूनच या आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले.

या मोर्चाचे नेतृत्व महामंत्री किरण मिलगीर, क्षेत्र संघटक सी.व्ही. राजेश, बाळासाहेब भुजबळ, हरी चव्हाण आणि इतर पदाधिकाऱ्यांनी केले. या आंदोलनात घरगुती कामगार, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, रिक्षा व टॅक्सी चालक, रेल्वे, संरक्षण आणि सहकारी बँक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.