‘सुचवा तुमच्या आवडीचा कौशल्य अभ्यासक्रम’ स्पर्धेत ६७ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग
१५ नोव्हेंबरपर्यंत स्पर्धेत सहभागाची संधी
(मुंबई आसपास प्रतिनिधी)
मुंबई दि.०६ :- ‘आयटीआय’च्या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने हाती घेण्यात आलेल्या ‘सुचवा तुमच्या आवडीचे कौशल्य अभ्यासक्रम’ या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. ५ नोव्हेंबरपर्यंत तब्बल ६७ हजार ९९० विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला, अशी माहिती राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
मागील काही वर्षांपासून ‘आयटीआय’च्या विविध अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असून अधिकाधिक विद्यार्थी कौशल्याधारित प्रशिक्षण घेऊन रोजगार किंवा स्वयंरोजगार करीत आहेत. आता उद्योगांमधील बदलते नवनवे तंत्रज्ञान आणि त्याअनुषंगाने ‘आयटीआय’च्या अभ्यासक्रमांमध्ये आवश्यक बदल करण्यासाठी विभागाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून १५ नोव्हेबरपर्यत ही राज्यस्तरीय स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे.
या स्पर्धेअंतर्गत सर्वाधिक २० हजार ७६० इतक्या विद्यार्थ्यांनी स्वयंरोजगाराशी संबंधित अभ्यासक्रम सुचविण्यासाठी सहभाग घेतला आहे. त्या खालोखाल २० हजार ३६४ विद्यार्थी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रम सुचविण्यासाठी कृषी क्षेत्रातील अभ्यासक्रम सुचविण्यासाठी १७ हजार ४४५ विद्यार्थी तर ४ हजार २५५ विद्यार्थी महिला रोजगाराशी संबंधित अभ्यासक्रम सुचविणार आहेत. ५ हजार १६६ विद्यार्थ्यांनी अतिशय उपयुक्त अभ्यासक्रम सुचविण्यासाठी स्पर्धेत नोंदणी केली आहे. यातील सुमारे ६१ टक्के विद्यार्थी ‘आयटीआय’च्या प्रथम वर्षातील तर २७ टक्के विद्यार्थी द्वितीय वर्षात शिकणारे आहेत. अधिक माहिती आणि स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्थानिक ‘आयटीआय’मध्ये संपर्क साधावा. सर्वोत्कृष्ट संकल्पना सुचविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक जिल्ह्यात ५ हजार, ३ हजार व २ हजार रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत.