जखम असताना पावसाच्या पाण्यातून, चिखलातून चालल्यास ‘लेप्टो’ होण्याची शक्यता अधिक
खबरदारी घेण्याचे बृहन्मुंबई महापालिकेचे आवाहन
मुंबई दि.२३ :- जखम झालेली असताना पावसाच्या पाण्यातून, चिखलातून चालल्यास ‘लेप्टो’ होण्याची शक्यता अधिक आह. तरी नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. पावसाच्या पाण्यातून किंवा चिखलातून चाललेल्या व्यक्तींनी २४ ते ७२ तासांच्या आत वैद्यकीय सल्ला घेऊन प्रतिबंधात्मक औषधोपचार करणे आवश्यक आहे. अतिवृष्टी दरम्यान पावसाच्या साचलेल्या किंवा वाहत्या पाण्यातून नागरिकांना चालावे लागते.
ऑटोरिक्षा, टॅक्सी चालकाने भाडे नाकारल्यास ‘व्हॉट्सॲप’ वर तक्रार करता येणार
याच पाण्यात ‘लेप्टोस्पायरोसिस’ या रोगाचे सूक्ष्म जंतू असू शकतात. अशा बाधीत पाण्याशी माणसाचा संपर्क आल्यास त्याला लेप्टोची बाधा होण्याची शक्यता असते, असे बृहन्मुंबई महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी सांगितले. व्यक्तीच्या पायाला किंवा शरीराच्या कोणत्याही भागाला जखम असेल, अथवा साधे खरचटलेले जरी असेल; तरी अशा छोट्याशा जखमेतून सुद्धा लेप्टोचे जंतू माणसाच्या शरीरात प्रवेश करतात.
त्यामुळे ज्या व्यक्तींचा पावसाच्या पाण्याशी संपर्क आला असेल, त्यांनी तातडीने वैद्यकीय सल्ल्यानुसार प्रतिबंधात्मक औषधोपचार करावेत, असे आवाहनही त्यांनी केले. बृहन्मुंबई महापालिकेचे बाळासाहेब ठाकरे दवाखाने किंवा आरोग्य केंद्रे, दवाखाने येथे संपर्क साधावा. या ठिकाणी वैद्यकीय तपासणी-मार्गदर्शन व आवश्यक ते औषधोपचार मोफत उपलब्ध आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
