उद्योजकांनी गुंतवणूक करताना प्राधान्यक्रम ठरवावा
सनदी लेखापाल संजीव गोखले यांचे प्रतिपादन
डोंबिवली दि.१२ :- प्रत्येक उद्योजकाने आपला व्यवसाय सोडून इतरत्र गुंतवणूक केली पाहिजे. ती करताना प्राधान्यक्रम ठरवावा, असे प्रतिपादन सनदी लेखापाल संजीव गोखले यांनी केले. टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ आणि सव्यासाची मंच यांच्या संयुक्त विद्यमाने खास उद्योजकांना गुंतवणुकीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
आपत्कालीन परिस्थितीसाठी तसेच आयुष्याच्या विविध टप्प्यांवर विविध कारणांसाठी उद्योजकाला अर्थ पुरवठा वेळेवर उपलब्ध व्हावा यासाठी गुंतवणूक अनिवार्य आहे. मुलांच्या शिक्षणासाठी व स्वतःच्या कौशल्य विकासानासाठी अवश्य गुंतवणूक करावी, असे त्यांनी सांगितले.
एकाच प्रकारच्या योजनेत सर्व पैसे न गुंतवता PPF, पेन्शन योजना, शेअर्स, मुच्युअल फंड, गोल्ड बॉण्ड्स, रिअल इस्टेट अशा विविध पर्यायांचा विचार करावा, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विनय भोळे यांनी केले तर टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीकांत पावगी यांनी संजीव गोखले यांचे स्वागत केले.