विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात उबाठा गटाची सर्वोच्च न्यायालयात याचिका
मुंबई, दि. ४
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उबाठा गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांच्या अपात्रतेसंबंधी लवकरात लवकर निर्णय घेण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती या याचिकेत उबाठा गटाने केली आहे.
एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने केली होती. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी नंतर
हा निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांचा असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते.
या सुनावणीला आता दोन महिने होत आले तरी विधानसभा अध्यक्षांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी अद्याप कोणतेही पाऊल उचलेले नाही. आम्ही (ठाकरे गट) विधानसभा अध्यक्षांना आतापर्यंत तीन वेळा निवेदन दिले पण त्याचा काही परिणाम झाला नसल्याचे उबाठा गटाचे म्हणणे आहे.
——-
