मुंबईत विनोद तावडे यांनी ऐकली ‘मन की बात’, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना वाहिली आदरांजली
मुंबई: भाजपचे केंद्रीय सरचिटणीस आणि राज्यसभा खासदार विनोद तावडे काल मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या मासिक रेडिओ कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणात सहभागी झाले होते. त्यांनी आपल्या स्थानिक वॉर्डमध्ये पक्षाचे वरिष्ठ नेते आणि उत्साही कार्यकर्त्यांसोबत बसून हा कार्यक्रम ऐकला आणि आपले अनुभव शेअर केले.

याप्रसंगी प्रदेश सरचिटणीस आशिष शेलार, मुंबई भाजप अध्यक्ष वीरेंद्र म्हात्रे यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
मायभूमीच्या प्रेमाने भारावलो; दिल्लीत राजकारण तर महाराष्ट्रात समाजकारण हेच ध्येय – विनोद तावडे
‘मन की बात’ मधून मिळाली सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा
कार्यक्रमानंतर विनोद तावडे यांनी सोशल मीडियावर आपला अनुभव शेअर करताना सांगितले की, पंतप्रधान मोदींनी ‘मन की बात’ मध्ये देशभरातील विविध स्वयंप्रेरित आणि यशस्वी प्रयोगांचा जो उल्लेख केला, त्यावर कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा झाली.
या कार्यक्रमामुळे कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक विचारांचा संचार झाला आहे. आपणही आपल्या स्तरावर सामाजिक आणि राष्ट्रहिताच्या नाविन्यपूर्ण गोष्टी कशा प्रकारे लागू करू शकतो, यावर सर्व कार्यकर्त्यांनी मंथन केले.

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन
‘मन की बात’ कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी विनोद तावडे आणि उपस्थित नेत्यांनी कुशल प्रशासक, न्यायप्रिय आणि लोककल्याणकारी शासक राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन केले.

