पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळूनही १२ हजार विद्यार्थ्यांची प्रवेशाकडे पाठ
मुंबई, दि. २७
मुंबई महानगर क्षेत्रातील महाविद्यालयांमध्ये पहिल्या गुणवत्ता यादी प्रवेश घेण्याची मुदत सोमवारी संपली. प्रवेश प्रक्रियेच्या कॅप फेरीत पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळूनही सुमारे १२ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही. या विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीसाठी अर्ज करता येणार नाही.
केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून पहिल्या गुणवत्ता यादीत निवड झालेल्या १ लाख ३६ हजार विद्यार्थ्यांपैकी ६३ हजार विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित केला तर कॅप फेरी आणि कोट्यातून आतापर्यंत ७५ हजार ९१३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
मुंबई महानगर क्षेत्रातील १ हजार ०१४ महाविद्यालयांमध्ये अकरावीची प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे. या महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी ३ लाख ८० हजार जागा उपलब्ध असून कॅप फेरीतून २ लाख ३८ हजार जागा उपलब्ध आहेत.
तर अल्पसंख्यांक कोटा, व्यवस्थापन कोटा आणि अन्य कोट्यातून इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी १ लाख ४१ हजार जागा उपलब्ध आहेत.
—-
