टेंभा आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनींच्या विनयभंग प्रकरणी अभाविप आक्रमक; प्रकल्प अधिकाऱ्यांना विचारला जाब
शहापूर:
शासकीय आदिवासी आश्रमशाळा, टेंभा (ता. शहापूर) येथे घडलेल्या अतिशय संतापजनक आणि लांच्छनास्पद दुर्घटनेच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप), कल्याण जिल्ह्याच्या वतीने गुरुवारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर धडक मोर्चा नेऊन तीव्र विरोध दर्शवण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला उघडकीस आलेल्या या घटनेत, आश्रमशाळेतील स्वयंपाकाच्या मदतनीसाने वेळोवेळी तब्बल २१ अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचे उघड झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहापूर तालुक्यात तीव्र संतापाची लाट पसरली आहे.
घटनेचे गांभीर्य ओळखून अभाविपच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ ‘एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, शहापूर’ यांच्या कार्यालयात धाव घेत प्रशासनाला धारेवर धरले. संशयित आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक केली असली तरी, प्रशासनाच्या एकूण कारभारावर अभाविपने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत:
इतके दिवस हा गंभीर प्रकार सुरू असताना आश्रमशाळा प्रशासन झोपले होते का?
या कृत्यात आरोपीला इतर कोणाचे सहकार्य होते का?
भरती प्रक्रियेदरम्यान संबंधित कर्मचाऱ्याची पार्श्वभूमी (Background Check) तपासली गेली होती का?
आगामी न्यायालयीन लढाई मजबूत करण्यासाठी प्रशासनाची काय तयारी आहे?
पीडित विद्यार्थिनी व पालकांचे मनोबल वाढवण्यासाठी आणि भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी काय उपाययोजना केल्या जाणार आहेत?
या सर्व प्रश्नांची सरबत्ती करत अभाविपने प्रशासकीय हलगर्जीपणाबद्दल तीव्र तीव्र रोष व्यक्त केला. तसेच मा. प्रकल्प अधिकाऱ्यांच्या नावे खरमरीत निवेदन सादर केले.
यावेळी आश्रमशाळेतील वातावरण पूर्ववत करण्यासाठी आणि विद्यार्थिनींमध्ये सुरक्षेची भावना निर्माण करण्यासाठी ‘मिशन साहसी’ सारख्या उपक्रमांची गरज प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. सद्यस्थितीत सकारात्मक सुधारणा आणण्यासाठी अभाविप पूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाहीही परिषदेच्या वतीने देण्यात आली.
निवेदन दिल्यानंतर कार्यालयाबाहेर माध्यमांशी बोलताना अभाविप कल्याण जिल्हा विद्यार्थिनी कार्य प्रमुख कु. सृष्टी रत्नाकर यांनी, पीडित विद्यार्थिनींना कठोर न्याय मिळेपर्यंत आणि आश्रमशाळांमधील सुरक्षा व्यवस्था मजबूत होईपर्यंत हा लढा सुरूच राहील, असा इशारा दिला.

