कडोमपाचा गलथान कारभार: कल्याणमधील मुख्य हिंदू श्मशानभूमी बनली कचऱ्याचे आगार, नागरिकांमध्ये तीव्र संताप
कल्याण (पश्चिम): कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या (कडोमपा) हद्दीत येणाऱ्या कल्याण पश्चिम, मुरबाड रोड येथील (रोशन पेट्रोल पंपाजवळ) मुख्य हिंदू श्मशानभूमी सध्या प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे आणि अकार्यक्षमतेमुळे अत्यंत दुरवस्थेत आहे. अंत्यसंस्काराच्या या पवित्र ठिकाणी चहूबाजूला कचऱ्याचे ढीग साचले असून, सगळीकडे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना तीव्र मनस्ताप सहन करावा लागत आहे.
कागदावर सफाई, प्रत्यक्षात मात्र कचराच
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण मनपाने या श्मशानभूमीच्या साफसफाईचे आणि देखभालीचे काम कागदावर एका खासगी कंत्राटदाराला दिले आहे. असे असतानाही प्रत्यक्ष परिस्थिती मात्र अत्यंत बिकट आहे. कंत्राटदार ही यंत्रणा सुरळीतपणे चालवण्यात पूर्णपणे अपयशी ठरला असून, मनपाचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
लाखांची चिमणी ठरतेय शोभेची वस्तू
या गंभीर समस्येवर प्रकाश टाकताना भागाचे माजी नगरसेवक विद्याधर भोईर यांनी सांगितले की:
“काही काळापूर्वी अंत्यसंस्काराच्या वेळी निघणारा धूर योग्य पद्धतीने बाहेर पडावा आणि श्मशानभूमी परिसर प्रदूषणमुक्त राहावा यासाठी येथे एक आधुनिक चिमणी बसवण्यात आली होती. परंतु, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ही चिमणी आजतागायत सुरूच होऊ शकलेली नाही. आता तर परिस्थिती इतकी वाईट आहे की, त्या चिमणीच्या अवतीभवतीही कचऱ्याचे ढीग साचले आहेत.”
प्रशासनाच्या या कारभारामुळे स्थानिक जनतेमध्ये प्रचंड रोष असून, लवकरच याचे रूपांतर तीव्र आंदोलनात होऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
सामाजिक संस्थांची तात्काळ कारवाईची मागणी
या दुरवस्थेवर तीव्र चिंता व्यक्त करत अग्रवाल समाज कल्याणचे अध्यक्ष अनिल कुमार गर्ग यांनी कडोमपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे निवेदन केला आहे कि प्रशासनाने या संवेदनशील विषयाची तातडीने दखल घ्यावी आणि श्मशानभूमी परिसर स्वच्छ करून या जागेचे पावित्र्य राखावे.
अंत्यसंस्कारासारख्या अत्यंत संवेदनशील जागेची झालेली ही दुरवस्था मनपाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह उभे करत आहे. आता या जनक्षोभानंतर तरी कुंभकर्णी झोपेत असलेले प्रशासन जागे होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
