गिरीश कुबेर माफी मागा – कपिल पाटील
लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी सभ्यतेच्या आणि सुसंस्कृततेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. स्त्रीविरोधी मनुवादी धर्मशास्त्राचे ते उघड समर्थन करत आहेत. ‘सुनेत्राताई तुम्ही चुकलात!’ या शीर्षकाखाली त्यांनी पहिल्या पानावर विशेष संपादकीय लिहलं आहे. कुबेर आता एवढंच सांगणं बाकी ठेवतात की, ‘सुनेत्राताईंनी सती जायला हवं, नाहीतर केशवपन करून घरात बसायला हवं.’ संपादकीयाची सगळी भाषा यापेक्षा वेगळी नाही.
राजकीय नेत्यांवर टीका करण्याचा पूर्ण अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. अवहेलना आणि उपमर्द करण्याचा मात्र नाही. सुनेत्रा वहिनींवर ज्या अश्लाघ्य भाषेत (ज्याला अभिजन वर्ग स्वतःचा धर्माधिकार गंड मानतो) त्यांनी संपादकीय लिहलं आहे, ते संतापजनक आहे. निवृत्ती – ज्ञानेश्वर भावंडांना बहिष्कृत करण्याचा निर्णय पैठणच्या धर्ममार्तंडांनी घेतला, संत तुकारामांच्या गाथा बुडवण्याची जुर्रत केली, थोरल्या शाहूंच्या कर्तबगार पत्नी सगुणाबाईंना चितेवर ढकलून दिलं गेलं, तोच धर्माधिकारी गंड दाखवत गिरीश कुबेर धर्मनिर्णय देतात.
विधवा ब्राह्मण स्त्रियांचं केशवपन करत विटंबना केली जायची. आयुष्यभर अपमान, छळ तर कधी बलात्कारही सहन करावे लागत. महात्मा फुलेंनी याविरोधात बंड केलं. नाभिकांना संप करण्याचं आवाहन केलं. विधवा ब्राह्मण स्त्रियांची मुक्तता केली. राजा राममोहन रॉय यांनी सतीप्रथा बंद केली. गिरीश कुबेर मात्र धर्मशास्त्र सांगतात. ‘धर्मसंस्कृती आणि परंपरेचा भाग म्हणून नंतरचे बारा दिवस सुतक पाळणे अपेक्षित असते आणि उदकशांतीपश्चात आप्तेष्ट, सुहृद यांच्या भोजनाने सुतक समाप्ती होते…’ सुतक काल संपेपर्यंत तेराव्यापर्यंत घरी बसायला गिरीश कुबेर सांगतात. हीच संस्कृती आणि परंपरा असल्याचे ते पुन्हा पुन्हा सांगतात.
इतिहासकाळापासून वैयक्तिक दुःखापेक्षा ‘राजधर्म’ आणि ‘समाजधर्म’ श्रेष्ठ मानले गेले आहेत. राज्य किंवा जनतेच्या हिताचा प्रश्न निर्माण झाला की अशौच, सुतक किंवा धार्मिक विधी बाजूला ठेवून कर्तव्य बजावण्यालाच भारतीय परंपरेने महत्त्व दिले आहे. नवऱ्याच्या मृत्यूनंतर खचून न जाता, अत्यंत धैर्याने कुटुंब व राज्याची धुरा वाहणाऱ्या स्त्रियांची उदाहरणे मराठी इतिहासात आहेत. छत्रपती शिवरायांनी आई जिजाऊंना सती जाण्यापासून रोखले आणि त्या स्वराज्याच्या जननी ठरल्या. छत्रपती राजाराम महाराजांच्या निधनानंतर सुतकात न अडकता ताराबाईंनी तात्काळ स्वराज्याची धुरा सांभाळली. लोकमाता अहिल्यादेवींना सती जाऊ न देता सासरे मल्हारराव होळकरांनी प्रजा कारभार सोपवला. झांसीच्या राणीने रणांगणात तलवार हाती घेतली. या महामानवींशी तुलना करण्याचं कारण नाही, पण त्या आदर्शावर चालत दुःखाची राख सावडल्यानंतर सुनेत्राताई धीरोदात्तपणे उभ्या राहत असतील तर त्यांचं स्वागत करायला हवं.
हाच सर्वोच्च संस्कार आहे. लोकशाहीमध्ये निवडून आलेले प्रतिनिधी जनतेला बांधील असतात. संविधानाने दिलेली शपथ ही धार्मिक विधी निरपेक्ष असते. सुनेत्राताई वैयक्तिक जीवनात धार्मिक व श्रद्धाळू आहेत. मात्र उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना त्यांनी शरद पवार आणि अजित दादांची परंपरा कायम ठेवली. ‘ईश्वरसाक्ष’ नाही, तर ‘गांभीर्यपूर्वक’ शपथ घेतली.
खरंतर कृषिकर्मांच्या दिवसांत घरात मढं असतानाही नांगरटीला जाणाऱ्या शेतकरी बाया-बाप्यांचा हा महाराष्ट्र आहे. गरज पडल्यास पदर खोचून तलवार हाती घेणाऱ्या खंबीर स्त्रियांचाही. मात्र जेव्हा स्त्रिया नेतृत्व करू पाहतात, तेव्हा प्रतिगामी त्यांना धर्मसंस्कार आणि उंबरठ्यात अडकवण्याचा प्रयत्न करतात. मुलींना शिकवण्यासाठी जाणाऱ्या सावित्रीबाईंवर दगड आणि चिखल फेकत सनातनी. लोकसत्तेच्या अग्रलेखात तेच दगड आणि तोच चिखल आहे.
याच गिरीश कुबेर यांनी Renaissance State: The Unwritten Story of the Making of Maharashtra या पुस्तकात छत्रपती शंभूराजांची बदनामी केली होती. (ज्याला कोणताही पुरावा आणि आधार नाही.) त्यांनी मदर तेरेसा यांच्याबाबतही लज्जास्पद टीका केली होती. त्यांना तो अग्रलेख मागे घ्यावा लागला होता. आता त्यांनी सुनेत्राताईंवर टीका करताना गंडशमनापर्यंतची भाषा केली. सुनेत्राताई केवळ महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आहेत म्हणून नव्हे, तर हा थेट स्त्रीत्वाचा अपमान आहे. ‘दादांच्या जाण्याने दुःखाचा डोंगर कोसळला असताना’, सुनेत्राताई लिहतात, ‘अजित दादांनी शिकवलेली कर्तव्यनिष्ठा, संघर्षाची ताकद आणि जनतेप्रती बांधिलकी हाच माझा आधार आहे. त्यांच्या स्वप्नातील न्यायप्रिय, समताधिष्ठित आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करत राहीन.’ आज कराडच्या प्रीतीसंगमावर जाऊन सुनेत्राताई पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीवर पुष्पचक्र वाहिले. त्यांची बांधिलकी स्पष्ट झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनेत्राताई यांच्या निर्णयाला साथ दिली. ‘ज्या धीरोदात्तपणे श्रीमती सुनेत्रावहिनींनी महाराष्ट्र हिताचा निर्णय घेतला, तो कौतुकास्पद, धाडसी आणि प्रतिबद्धता अधोरेखित करणारा आहे.’ खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अजित दादांची आठवण देत, त्यांचं स्वप्न सुनेत्राताई पुढे नेतील अशा शुभेच्छा दिल्या.
हिंदूधर्माभिमानी म्हणून समाज माध्यमांवर व्यक्त होणाऱ्या, कधी तुटून पडणाऱ्या शेफाली वैद्य या सुद्धा सुनेत्रावहिनींच्या बाजूने उभ्या राहिल्या आहेत. सुतक प्रेमाच्या विरोधात.
माझा मित्र दिनेश गुणे याने अत्यंत कडक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘सुनेत्राताईंचे काही चुकले असेलच, तर ते दाखवून देण्यासाठी गिरीश कुबेर या भोंदू पुरोगाम्याने प्रतिगामी परंपरांचा आधार घेऊन धर्मनिर्णय देण्याचा बुरसटलेपणा करायला नको होता! लोकसत्ताच्या पुरोगामी प्रतिमेला बट्टा लागला!!’
कुबेरांनी म्हटलंय, ‘सुनेत्राताईंचे सार्वजनिक आयुष्य अजिबात दखलपात्र नव्हते… पतीने फर्मावले म्हणून…पतीच्या राजकीय गंड शमनार्थ त्या राज्यसभा सदस्य झाल्या.’
गंडशमन विधी हा जन्मदोषाशी निगडित आहे. कर्मविपाकाचा सिद्धांत हा त्याचा आधार आहे. धर्मशास्त्राचा इमलाच या कर्मविपाक सिद्धांतावर उभा आहे. कुबेर त्या सिद्धांताचे समर्थक आहेत. नव्हे, धर्मशास्त्री म्हणून निर्णय देत आहेत.
कुबेरांचं हे ‘विचारधन’, ‘न स्त्री स्वातन्त्र्यमर्हति’ या मनुस्मृतीच्या विचाराने खच्चून भरलेलं आहे.
लोकसत्ताच्या संपादकांची परंपरा ही प्रबोधनवादी, रॉयवादी व मानवतावादी राहिलेली आहे. गिरीश कुबेर या परंपरेतले आहेत, असा अनेक भोळसटांचा आणि त्यांना संपादक म्हणून पुढे आणणाऱ्यांचा समज आहे. कुबेर विद्वान जरूर आहेत, पण यातल्या कोणत्याच परंपरेशी त्यांचा संबंध नाही.
गिरीश कुबेर यांनी हा अग्रलेख (लोकसत्ता विशेष संपादकीय – 1 फेब्रुवारी 2026) मागे घ्यावा, महाराष्ट्राची माफी मागावी. खरं तर त्यांनी आता राजीनामाच द्यावा. आता खूप झालं.
साभार – कपिल पाटील (पूर्व आमदार, विधान परिषद) यांचा फेसबुक पोस्ट वरून!
#Loksatta
#DevendraFadnavis
#EknathShinde #एकनाथसंभाजीशिंदे
#SunetraAjitPawar
