उद्यानाच्या स्वच्छतेसाठी स्वतः पुढाकार घेणाऱ्या जेष्ठ नागरिकांचा सन्मान समारंभ
डोंबिवली: उद्यानाच्या स्वच्छतेसाठी स्वतः पुढाकार घेणाऱ्या जेष्ठ नागरिकांचा सन्मान समारंभ डोंबिवली पूर्वच्या सुनील नगर परिसरातील कवयित्री बहिणाबाई चौधरी उद्यानात आज शनिवार दिनांक ५ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ८:०० वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सदर उद्यानात नागरिक निसर्गाच्या सान्निध्यात चालणे, व्यायाम करणे यांसारख्या शारीरिक क्रियांमध्ये सहभागी होण्यासाठी दररोज मोठ्या संख्येने येतात. विशेषतः सकाळी ६:०० ते ९:०० या वेळेत आणि संध्याकाळी ५:०० ते ८:०० या वेळेत अनेक जेष्ठ नागरिक आणि कुटुंबे लहान मुलांसह उद्यानात भेट देतात.
मात्र, उद्यानातील सुकलेल्या पानांमुळे होणारा कचरा नियमितपणे न साफसफाई केल्याने येथील वातावरण दूषित होत होते. महापालिकेकडून वेळोवेळी विनंती करूनही यावर कोणतीही कारवाई न झाल्यामुळे, उद्यानात नियमित येणाऱ्या काही जेष्ठ नागरिकांनी स्वतःच हातात झाडू घेऊन उद्यानाच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला.
दररोज सकाळी व्यायामासाठी येणारे हे सुज्ञ जेष्ठ नागरिक आळीपाळीने उद्यानात सुकलेली पाने, प्लास्टिक आणि इतर कचरा वेचून स्वच्छता करतात. त्यांनी हे काम केवळ समाजसेवेच्या भावनेतून हाती घेतले असून, उद्यानातील स्वच्छतेची जबाबदारी पार पाडली आहे. त्यांच्या या सततच्या सेवेमुळे उद्यानाचे सौंदर्य आणि स्वच्छता कायम राखली गेली आहे.
सदर सत्कार समारंभात उपस्थित सर्व मान्यवर नागरिकांनी या जेष्ठांपैकी श्री शरद जोशी, श्री राजेंद्र मुळे, श्री विकास सावकारे, श्री सचिन विरनोडकर, श्री केशव करकेरा, सौ. माधुरीताई कोरडे, श्री प्रसाद सावंत, आणि ज्येष्ठ नागरिक सौ रेखाताई नारखेडे यांना शाल श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार करत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
स्वच्छतेसाठी स्वतः पुढाकार घेणाऱ्या या नागरिकांचे महत्त्वपूर्ण योगदान ओळखून, त्यांच्याविषयी उपस्थितांमार्फत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या छोटेखानी पण हृदयस्पर्शी कार्यक्रमाने उद्यानातील जेष्ठ नागरिकांच्या सेवाभावी वृत्तीचे उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवले आहे.
माजी नगरसेवक व शिवसेना कार्यालय प्रमुख श्री प्रकाश शांताराम माने, उद्योजक श्री विक्रम म्हात्रे आणि इंटेरियर डेकोरेटर्स श्री प्रदीप सुधाकर पवार यांच्या पुढाकाराने हा सत्कार सोहळा नागरिकांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडला आणि महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेला या जेष्ठ नागरिकांनी दिलेला हातभार कौतुकास पात्र ठरला.