राज्यात सरासरीच्या १०४ टक्के पाऊस पेरण्या ८५ टक्के….
मुंबई दि.२७ :- राज्यात आत्तापर्यंत सरासरीच्या १०४ टक्के पाऊस झाला. १७८ तालुक्यात सरासरीच्या १०० टक्क्यांपेक्षा जास्त, १३० तालुक्यात ७५ ते १०० टक्के आणि ५८ तालुक्यात ५० ते ७५ टक्के पाऊस झाला आहे. जास्तीच्या पावसामुळे पेरणी वाया गेली किंवा दुबार पेरणीची वेळ आल्यास महाबीजने संपूर्ण नियोजन केले आहे अशी माहिती कृषी विभागातर्फे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अध्यक्षस्थानी होते.
मुंबईसह ठाणे, डोंबिवली आणि कल्याण परिसरात मुसळधार – मुंबईत उद्या सकाळी साडेआठवाजेपर्यंत अतिमुसळधार
राज्यात १२० लाख ३७ हजार हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच सरासरीच्या ८५ टक्के पेरणी झाली आहे. यवतमाळ, जळगाव, बीड, नांदेड, बुलढाणा येथे अधिक पेरणी झाली असून सांगली, ठाणे, पुणे, सोलापूर, गडचिरोली येथे कमी पेरणी झाली आहे. सर्वाधिक पेरणी सोयाबीनची १११ टक्के आणि कापसाची ९६ टक्के झाली आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेत यावेळी शेतकऱ्यांचा सहभाग वाढला असून १२०.६८ लाख शेतकरी सहभागी झाले आहेत. गेल्या वर्षी खरीप हंगामात ९६.६२ लाख शेतकरी सहभागी झाले होते.
