8 फेब्रुवारीला आगरी सेनेच्या वतीने शिरसाड नाका येथे रास्ता रोको आंदोलन
(म विजय)
पालघर, दि.०७ – आपले अस्तित्व आणि एकजुटीचे दर्शन घडवून स्थानिक भूमीपुत्रांच्या विविध समस्या शासन दरबारी मांडण्यासाठी आगरी सेना या सामाजिक संघटनेच्या वतीने पावार, 8 फेब्रुवारी 2019 रोजी सकाळी 10 वाजता मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील शिरसाड नाका येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात पालघर जिह्यातील आगरी, कोळी, आदिवासी, शेतकरी, कामगार असे स्थानिक भूमीपुत्र सहभागी होणार आहेत, अशी माहिती आज एका पत्रकार परिषदेत देणयात आली. पत्रकार परिषदेला आगरी सेना प्रमुख राजाराम साळवी, सरचिटणीस मेघनाथ पाटील, प्रदीप साळवी, राहूल साळवी, कैलास पाटील, जनार्दन पाटील, चेतन गावंड, भुपेश कडुळकर, आत्माराम पाटील, प्रशांत पाटील उपस्थित होते.
हेही वाचा :- लोकलच्या गर्दीमुळे आणखी एका डोंबिवलीकर तरूणाचा बळी
पालघर जिह्यातील विविध मागण्यांसाठी हे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. त्यात तुंगारेश्वर पर्वतावरील तीर्थक्षेत्र परशुराम पुंड, पारोळकडून येणारा ग्रामीण मार्ग क्र. 250 व सातिवलीकडून येणारा मार्ग क्र. 87 हे दोन्ही रस्ते तयार करणे. तसेच तुंगारेश्वर पर्वतावरील मंदिराला देवस्थान म्हणून परवानगी देऊन 69 गुंठे जमिन श्री सदानंद महाराज आश्रम संस्थेच्या नावावर करून देणे. पालघर जिह्यात येऊ घातलेल्या सरकारी विविध प्रकल्पांत भूमीपुत्रांना तृतीय व चतुर्थ श्रेणीच्या नोकऱयांमध्ये आरक्षण देणे. ओएनजीसी सर्वेक्षणासाठी दोन महिने मासेमारी बंद केली आहे, या दरम्यान मच्छीमारांना नुकसान भरपाई मिळावी. वसई-विरार शहर महापालिका क्षेत्रातील मालमत्ता करांमध्ये करण्यात आलेली वाढ रद्द करावी. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबई-वडोदरा महामार्ग व विरार-अलिबाग कॉरीडोअर या प्रकल्पातील बाधित शेतकऱयांना योग्य मोबदला द्यावा, अन्यथा प्रकल्पास विरोध करण्यात येणार आहे. वीज बिलांमध्ये होणारी वाढ, नादुरुस्त वीज मीटर यात वीज कंपनीने योग्य ती सुधारणा करून नागरिकांना सुविधा द्यावी या मागण्यांचाही समावेश आहे.