प्लास्टीकचा वापर अनिवार्य; मात्र तो काळजीपूर्वक आणि आवश्यक तेवढाच करायला हवा – उपराष्ट्रपती
विकासाकडे वाटचाल करतांना व्यवहारात प्लास्टीकचा वापर अनिवार्य ठरतो, मात्र त्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी ते जबाबदारीने आणि आवश्यक तेवढेच वापरायला हवे. तसेच त्याचा पुनर्वापर करणे आवश्यक आहे, असे मत उपराष्ट्रपती एम. व्यंकेय्या नायडू यांनी व्यक्त केले. चेन्नई इथल्या प्लास्टीक अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात ते आज बोलत होते. या संस्थेमध्ये प्लास्टीक आणि त्याच्याशी संबंधित उद्योगांचा अभ्यास केला जातो. आजच्या जीवनशैलीत प्लास्टीकचा वापर पूर्णपणे टाळणे अशक्य आहे.
हेही वाचा :- 70 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचा देशाला उद्देशून संदेश
हलक्या वजनाचे टिकाऊ आणि बहुउपयोगी असल्यामुळे तसेच सर्वांना परवडणारे असल्याने त्याला मोठी मागणी आहे. अनेक महत्वाच्या क्षेत्रात प्लास्टीकचा वापर उपकारकच ठरला आहे, असे उपराष्ट्रपती म्हणाले. भारतीय अर्थव्यवस्थेतील प्लास्टीक उद्योगाचे मोठे योगदान आहे. असे असले तरी प्लास्टीकचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणामही घातक आहेत. त्यामुळे यात सुवर्णमध्य साधण्यासाठी प्लास्टीकवर प्रक्रिया करुन त्याचा पुनर्वापर केला जावा, तसेच नष्ट होणारे पॉलिमर विकासित करण्यासाठी संशोधन केले जावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.