कल्याण डोंबिवलीत एकच चर्चा, मनसे व भाजपाचा संयुक्त मोर्चा ?
कल्याण डोंबिवलीत एकच चर्चा
मनसे व भाजपाचा संयुक्त मोर्चा ?
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघात पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर झाला असल्याने सोमवारी मनसेने आमदार राजू पाटील यांच्या नेतृत्वाखाली केडीएमसी मुख्यालयावर हंडा मोर्चाचे आयोजन केले होते .
मनसे व भाजपाची जवळीक वाढत असली तरी अजून अधिकृत सोयरिक जुळलेली नाही .तरीही मनसेच्या या मोर्चात अचानक भाजपा देखील सहभागी झाली ,
त्यामुळे हा मोर्चा मनसे व भाजपाचा संयुक्त मोर्चा ठरल्याने या मोर्च्याची आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीत एकच चर्चा सुरु झाली आहे .
कल्याण डोंबिवली महापालिकेतील २७ गावे कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात आहेत .ग्रामीण भागाला एमआयडीसी कडून पाणीपुरवठा केला जातो .
मात्र याच भागात मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई जाणवते . वास्तविक २७ गावातील पाणी टंचाई हि काही गेल्या ५ वर्षात निर्माण झालेली नाही .
त्यापूर्वी या २७ गावात ग्रामपंचायती होत्या ,याच काळात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे झाल्याने गावांचे शहरीकरण झाले .परिणामी अस्तित्वात असलेली पाणीपुरवठा योजना अपुरी ठरू लागली .
२०१५ मध्ये २७ गावे पुन्हा महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर महापालिकेने येथील नागरिकांना दिलासा देण्यासाठी टँकरद्वारा पाणीपुरवठा सुरु केला तो आजही कायम आहे .
तसेच महापालिकेने याच २७ गावांसाठी केंद्र सरकार व राज्य सरकारकडे पाठपुरावा करून १९० कोटी रुपये खर्चाची — दशलक्ष लिटर्स क्षमतेची अमृत योजना मंजूर करून घेतली .विशेष म्हणजे हि २७ गावे महापालिकेत राहतील कि नाही ? हाच प्रश्न निर्माण झाला होता .
त्यामुळे एखाद्या ठेकेदाराने या कामाचे टेंडर घेतले तर त्याला त्याचे बिल मिळेल कि नाही ? हीच निर्माण झाल्याने कोणीही ठेकेदार या योजनेचे काम करण्यास तयार नव्हता .
यामुळे टेंडर प्रक्रियेलाच वर्षभरापेक्षा अधिक वेळ गेला .त्यानंतर कोरोना महामारीमुळे दीड वर्षांपेक्षा अधिक काल लॉक डाऊन मध्ये काम बंद होते . जलकुंभ बांधण्यासाठी जागा मिळत नव्हती .
अशा अनेक अडचणी या अमृत योजनेचे काम पूर्णत्वास जाण्यास विलंब होत आहे . हि सर्व वस्तुस्थिती येथील सर्वच राजकीय पक्ष ,त्यांचे नेते व आमदार यांना चांगलीच माहिती आहे .
आता काम अंतिम टप्प्यात आले असतानाच हा मोर्चा काढण्यात आला आहे .
२०१५ ते २०२० दरम्यान कल्याण डोंबिवलीत महापालिकेत भाजपाचे ४२ नगरसेवक होते ,त्यापैकी ८ – १० नगरसेवकांनी भाजपाला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला तर मनसेचे ९ नगरसेवक होते त्यापैकी एकाने भाजपात प्रवेश केला .
आता भाजपा व मनसे यांची जवळीक वाढत असली तरी अजून तरी अधिकृत सोयरिक म्हणजे युती झालेली नाही .डोंबिवली शहरात ज्या भागात भाजपाचे वर्चस्व आहे ,
त्याच भागात मनसेची देखील ताकद आहे .त्यामुळे शिवसेनेला तशी फारशी चिंता नाही .भविष्यात भाजप मनसे युती झाल्यास जागा वाटप हा कळीचा मुद्दा ठरणार आहे .परंतु मनसेचे आमदार राजू पाटील व डोंबिवलीचे आमदार हे सख्खे शेजारी असल्याने जसे काहीही घडू शकते .
तसेच सोमवारी मनसेने आयोजित केलेल्या मोर्चात भाजपा अचानक सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले .मनसे व भाजपा यांचा संयुक्त मोर्चा केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीत चर्चेचा विषय ठरला आहे
वरिष्ठ पत्रकार विजय राऊत यांच्या फेसबूक वॉल वरून साभार