डिजिटल इंडिया’ला वेग देण्यासाठी ग्रामीण भागातील मनोऱ्यांकरिता मोफत जागा
मुंबई दि.३० :- गावोगावी इंटरनेटची सुविधा वाढविण्यासाठी ‘डिजिटल इंडिया’ मोहिमेला वेग देण्याकरिता राज्यातील २ हजार ३८६ गावांमध्ये ‘बीएसएनएल’ला मनोरे उभारण्यासाठी २०० चौ.मी. जागा मोफत देण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
केंद्र शासनातर्फे सर्व गावांमध्ये ४ जी सेवा उपलब्ध करण्यासाठी ९ डिसेंबर २०२३ चे उद्दीष्ट असून त्याअनुषंगाने भारत संचार निगमने दिलेल्या प्रस्तावानुसार हा निर्णय घेण्यात आला. यामध्ये निवडक गावांमध्ये २०० चौ.मी खुली जागा अथवा गायरान जमिन विनामुल्य देण्यात येणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे आलेल्या प्रस्तावाला मनोरा उभारणीस १५ दिवसात मंजुरी तर महावितरण कंपनीने दोन ते तीन महिन्याच्या कालावधीत वीज पुरवठा व जोडणी देणे आवश्यक आहे. केबल टाकण्यासाठी या ठिकाणच्या रस्त्याचा वापर विनामुल्य करण्यास मान्यता देण्यात येत असून या ऑप्टीकल फायबर केबल साठी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून कुठलेही भाडे आकारण्यात येणार नाही, असा निर्णयही यावेळी घेण्यात आला.