चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम संकल्पना पुढील वर्षापासून महाराष्ट्रात – प्र कुलगुरू डॉ. अजय भामरे
डोंबिवली आसपास प्रतिनिधी
डोंबिवली- चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम ही संकल्पना पुढील वर्षांपासून महाराष्ट्र राज्यात प्रत्यक्षात येईल, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. अजय भामरे यांनी डोंबिवली येथे केले.
टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाच्या टिळकनगर वाणिज्य महाविद्यालयाच्या उदघाटन सोहळ्यात ते बोलत होते. टिळकनगर विद्या मंदिराच्या पेंढरकर सभागृहात हा कार्यक्रम झाला.उदघाटक म्हणून ‘आयसीटी’चे विभाग प्रमुख डॉ. रवींद्र कुलकर्णी तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित होते.
डॉ. रवींद्र कुलकर्णी म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे आगामी काळात पदवी अभ्यासक्रमांमध्ये अमुलाग्र बदल होणार असून बारावीला विशेष महत्व राहणार नाही. बारावीच्या समकक्ष पर्यायी अभ्यासक्रम सुरू होतील.
तर रवींद्र चव्हाण यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे आगामी काळात उपलब्ध होणाऱ्या संधी आणि त्याचे फायदे याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी डोंबिवलीतील शिक्षण संस्थांनी एकत्रितपणे पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यवाह आशीर्वाद बोंद्रे यांनी केले. टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळातर्फे अध्यक्ष डॉ. संदीप घरत यांनी मनोगत व्यक्त केले. तर कार्याध्यक्ष श्रीकांत पावगी यांनी आभार मानले.