Skip to content
मुंबई दि.१४ :- शालेय विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी मुलांनी सतत नवीन काहातरी करत राहिले पाहिजे. त्यामुळे मुलांमध्ये सर्जनशीलता वाढेल, असे प्रतिपादन ‘भारतीय मानसोपचार सोसायटी’चे अध्यक्ष डॉ. विनय कुमार यांनी व्यक्त केले.
लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वोपचार रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयात ‘शालेय विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य’ या विषयावरील चर्चासत्रात डॉ. कुमार बोलत होते. कोरोनंतरचे शिक्षण, लैंगिकता, किशोरावस्था आणि शालेय मानसिक आरोग्याच्या संबंधात पौगंडावस्थेतील बाबी यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर देखील या चर्चासत्रामध्ये चर्चा करण्यात आली. चर्चासत्रात राज्यभरातील अनेक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि मानसोपचार तज्ज्ञ उपस्थित होते, राज्यभरातील जवळपास ६०० पेक्षा अधिक शाळांनी या चर्चासत्रात सहभागी नोंदविला. यावेळी मुंबई मानसोपचार सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अविनाश देसूसा, डॉ. केर्सी चावडा यांच्यासह तज्ञांनी मार्गदर्शन केले.
शालेय विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी शिक्षकांसोबतच पालकांची देखील तेवढीच महत्त्वाची जबाबदारी आहे. पालकांनी मुलांसोबत सतत संवाद साधला पाहिजे, त्यांच्यासोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवले पाहिजेत. मुलांच्या प्रगतीसाठी आणि वाढीसाठी त्यांचं मानसिक आरोग्य चांगले राहणे ही अतिशय गरजेची बाब आहे. त्यामुळेच मुलांना रोजच्या रोज व्यायाम, पोहणे, शारीरिक खेळ, बौद्धिक खेळ, वाचन, चित्र काढणे यासोबतच नवनवीन गोष्टी शिकणे फार महत्त्वाचे असते. यासाठी शिक्षकांबरोबरच पालकांनी देखील प्रयत्न केले पाहिजेत, असा देखील सूर चर्चासत्रामध्ये व्यक्त करण्यात आला.