मराठवाडा, विदर्भातील प्रश्नांना न्याय देण्यासाठी नागपूरचे अधिवेशन किमान तीन आठवडे घ्यावे
विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मागणी
मुंबई दि.१३ :- करोनामुळे दोन वर्षे नागपूरला हिवाळी अधिवेशन होऊ शकले नाही. नागपूर, विदर्भाच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी, विदर्भवासियांमधील दुर्लक्षाची भावना दूर करण्यासाठी नागपूरचे हिवाळी अधिवेशन किमान तीन आठवडे घेण्यात यावे, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मंगळवारी येथे केली.
विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत पवार बोलत होते. पवार यांनी केलेली मागणी विचारात घेऊन अधिवेशनकाळात नागपूर येथील पुढील बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्याचे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहूल नार्वेक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केले. विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक मंगळवारी विधान भवनात झाली. बैठकीस विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आदी उपस्थित होते.
मराठवाडा मुक्ती संग्रामाचे यंदा अमृतमहोत्सवी वर्ष असून तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने अर्थसंकल्पात ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मराठवाडा, महाराष्ट्रातील नागरिकांना, सर्वपक्षीय नेत्यांना सोबत घेऊन मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात यावे, मराठववाडा मुक्तीचा संघर्ष नव्या पिढीपर्यंत घेऊन जावा, विधिमंडळ सदस्यांना सभागृहाच्या कामकाजात अधिकाधिक भाग घेता यावा, यासाठी सभागृहाचे कामकाज सकाळी साडेनऊ वाजल्यापासून सुरु व्हावे, आदी मागण्याही पवार यांनी या बैठकीत केल्या.