Thursday, June 18, 2026
Latest:
ठळक बातम्या

नागरी समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी डोंबिवलीकरांचे घंटानाद, थाळीनाद आंदोलन

(डोंबिवली आसपास प्रतिनिधी)

डोंबिवली दि.२१ :- रस्त्यांची दूरवस्था, पाणी समस्या, वाहतूक कोंडी, बेशिस्त रिक्षाचालक आणि यासारख्या अनेक नागरी समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सर्वसामान्य डोंबिवलीकरांनी गुरुवारी रात्री डोंबिवली पूर्व येथील आप्पा दातार चौकात घंटानाद, थाळीनाद आंदोलन केले.‌ तर काही ठिकाणी घरातील/दुकानातील दिवे बंद करून आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. नागरी सोयी- सुविधांचा झालेला बट्ट्याबोळ, ढिम्म महापालिका प्रशासन आणि निद्रिस्त सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी यांचा निषेध यावेळी करण्यात आला.‌

हेही वाचा :- महापालिका, शासकीय जागेवरील पुनर्विकासाठी विकास शुल्क देणे बंधनकारक

गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमावर या विषयावर चर्चा सुरू होती, संदेश फिरत होते.‌ विविध सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते, पदाधिकारीही आंदोलनात सहभागी झाले होते.

‘डोंबिवलीतील खड्डे जगात भारी’ अशा उपहासात्मक ओळी लिहिलेले टी शर्ट काही तरुणांनी परिधान करून कडोंमपाचा निषेध केला. ‘एक दोन, तीन चार, केडीएमसीचा धिक्कार’ अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या.

हेही वाचा :- नेरळ- माथेरान मिनी ट्रेन उद्यापासून पुन्हा सुरू

डोंबिवलीच्या एमआयडीसी विभागातील काही नागरिक तसेच दक्ष नागरिक मंचाच्या कार्यकर्त्यांनी डोंबिवलीतील नागरी सोयी-सुविधांचा अभाव व दूरवस्थेबाबत आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच साकडे घातले आहे. लेखी/छापील पत्र, इ मेलच्या माध्यमातून मोदी यांचेही लक्ष वेधून घेतले आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र किंवा ई मेल करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान घंटानाद/थाळीनाद आणि दिवे बंद आंदोलनाचे पुढील टप्पे वेळोवेळी समाज माध्यमांतून जाहीर केले जाणार आहेत.‌

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *