आयात नेत्यांमुळेच भाजप क्रमांक एकचा पक्ष!
आयात नेत्यांमुळेच भाजप क्रमांक एकचा पक्ष!
निवडणुकीच्या काळात भाजपमध्ये इतर पक्षातून आयात झालेल्या नेत्यांमुळे भाजप राज्यात आणि केंद्रात पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला, असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी येथे केले.
पक्षाच्या संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने नागपुरात आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पक्षातील निष्ठावंतांना स्थान देण्यात न आल्याने ते नाराज आहेत काय? असे त्यांना विचारले असता ते म्हणाले, पक्षाचा कार्यकर्ता हा पदासाठी कधीच काम करीत नाही. भाजप देशात पूर्वी चौथ्या क्रमांकाचा पक्ष होता. तो कधीच दुसऱ्या क्रमांकावर आला नाही. मात्र, निवडणुकीच्या काळात इतर पक्षांतील नेते व कार्यकर्ते भाजपत आले. त्यामुळे आता पक्ष राज्यात आणि केंद्रात क्रमांक एकचा पक्ष झाला आहे. काही ठिकाणी राजकीय हतबलता असल्यामुळे आयात करण्यात आलेल्या नेत्यांना सत्तेत किंवा अन्य ठिकाणी स्थान देण्यात आले, अशी क बुलीही दानवे यांनी दिली. प्रसाद लाड हे भाजपचे कार्यकर्ते होते आणि त्यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांनी आम्हाला ‘प्रसाद’ दिला नाही तर पक्षानेच ‘प्रसाद’ दिला आहे.
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल बोलताना दानवे म्हणाले, आघाडी सरकारने ७ हजार कोटींचे कर्ज दिले होते पण त्याचा फायदा किती शेतकऱ्यांना झाला. याचा हिशेब अद्याप बँकांनी सरकारला दिला नाही. त्यामुळे युती सरकारने लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या तपासून कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे.