राज्य शासनाने केला जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा गौरव
प्रगत महाराष्ट्र धोरणाची प्रभावी अंमलबजावणी
ठाणे जिल्हा परिषदेने प्रगत महाराष्ट्र धोरणाची मागील तीन वर्षापासून प्रभावी अंमलबजावणी करत जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्तेत सकारात्मक बदल घडवला आहे.या कामाची दखल शिक्षण विभागाने घेवून मुख्य सचिव सुमित मलिक यांच्या हस्ते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार , शिक्षणाधिकारी मीना यादव , जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यवसायिक विकास संस्थाच्या प्राचार्या विजया चिंचोळीकर यांना सन्मानपत्र देऊन गौरविले. यावेळी प्रधान सचिव (शिक्षण विभाग) उपस्थित होते
२०१५ च्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र धोरणाच्या अनुषंगाने १०० टक्के मुल शैक्षणिक दृष्ट्या प्रगत होण्यासाठी प्रत्येक मुलाची भाषा आणि गणित विषयाची अध्ययन स्तर निश्चिती केली जात आहे. भाषा या विषयात ७३. २५ टक्के विद्यार्थी प्रगत ठरले असून गणित विषयात ६३. ४५ टक्के विद्यार्थी प्रगत ठरले आहेत. जिल्ह्याच्या जिल्ह्यातील अंबरनाथ , भिवंडी , कल्याण , मुरबाड , शहापूर या पाच तालुक्यात असणाऱ्या १३३१ (तेराशे एकतीस ) शाळांमध्ये १०० टक्के मुल प्रगत झाली पाहिजेत हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून अध्ययन स्तर निश्चित करण्याचा पारदर्शी प्रकल्प राबवला जात असल्याचे शिक्षणाधिकारी मीना यादव यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या १०० टक्के शाळा डिजिटल झाल्या असून बहुतांश शाळांमध्ये ज्ञानरचनावादी शिक्षण सुरू आहे. कृती युक्त शिक्षण पद्धतीने विद्यार्थी शिकत असल्याने गणितीय क्रियेत मुलांची प्रगती होत आहे. जिल्हातील तंत्रस्नेही शिक्षकांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची राज्य शासन दखल घेत असून स्वयंपूर्ण शाळांच्या दिशेने जि.प. शाळांच्या पथदर्शी वाटचाल सुरु असल्याची प्रतिक्रिया मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी दिली.