महत्वाकांक्षी, परिवर्तनात्मक दूरदृष्टीमुळे भारत गुंतवणुकीसाठी सुरक्षित ठिकाण : उपराष्ट्रपती
नवी दिल्ली, दि.१९ – महत्वाकांक्षी, परिवर्तनात्मक दूरदृष्टीमुळे भारत गुंतवणुकीसाठी जगातील सर्वात आवडते ठिकाण बनले आहे असे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे. माल्टा येथे माल्टा चेंबर ऑफ कॉमर्स आणि भारतीय उद्योग महासंघाने आयोजित केलेल्या भारत-माल्टा व्यापार मंचाला ते संबोधित करत होते. माल्टाच्या अध्यक्ष मेरी लुईज कोलेरो प्रेका यावेळी उपस्थित होते. अर्थराज्यमंत्री शिव प्रताप शुक्ला आणि अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर 8 टक्क्यांच्या आसपास असून सध्या जगातील वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असल्याचे उपराष्ट्रपती म्हणाले. सामाजिक सुधारणा राबवण्यासाठी विकास आणि वाढ आवश्यक असल्याचे सांगून ते म्हणाले की, प्रत्येक बाबतीत परिवर्तन घडवून आणण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
2025 पर्यंत देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर बनवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे उपराष्ट्रपती म्हणाले. जागतिक बँकेच्या व्यवसाय सुलभता निर्देशांकात भारताने यावर्षी 30 स्थानांनी झेप घेतली. 2018-19 मध्ये भारताचा विकास दर 7 टक्क्यांहून अधिक राहील, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणे निधीने व्यक्त केल्याचे ते म्हणाले.
सरकारने डिजिटल अर्थव्यवस्था, वित्तीय समावेशकता, जीएसटी यासारख्या आर्थिक सुधारणा राबवल्याचे उपराष्ट्रपती म्हणाले. गेल्या चार वर्षात 326 दशलक्षापेक्षा अधिक लोकांनी बँक खाती उघडून वित्तीय समावेशकता प्रत्यक्षात आणली आहे. कर भरण्यातही वाढ झाल्याचे ते म्हणाले.