प्रत्येकाच्या अकौंटमध्ये १५ लाख जमा करणार, असं मोदी बोललेच नव्हते : माधव भंडारी
पुणे – सत्तेवर आल्यानंतर प्रत्येक भारतीयाच्या अकौंटमध्ये पंधरा लाख रुपये जमा केले जातील, असे आश्वासन नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत दिले नव्हते. तसे विधानही केले नव्हते. तसं असेल तर मला त्यांच्या भाषणाची क्लिप दाखवा, असे आव्हान भाजपचे प्रवक्त माधव भंडारी यांनी दिले.
पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील स्पष्टीकरण केले. `२०१४ मध्ये आम्ही सत्तेवर येऊ असे वाटत नव्हते. त्यामुळे त्या वेळी भरपूर आश्वासने दिली, असे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले होते. त्यावर भांडारी हे बोलत होते.
या मुद्यावर भंडारी यांना बरीच सावरासावर करावी लागली. निवडणूक प्रचारात एखादा मुद्दा उपस्थित केला म्हणजे त्याचं आश्वासन दिलं असं होतं नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला. राहिला प्रश्न १५ लाख रुपयांच्या आश्वासनांचा तर पंतप्रधान मोदीनी असं कुठेही विधान केलेलं नाही, जर असेल तर तशी क्लिप दाखवा, असे आव्हान त्यांनी दिले.
गडकरी यांचे वक्तव्य मी प्रत्यक्ष ऐकलेले नाही, तरीसुद्धा ते ज्या कार्यक्रमात ते बोलले तो बिगर राजकीय आणि अनौपचारिक गप्पाटप्पांचा कार्यक्रम होता, त्यामुळे ते विधान हलक्याफुलक्या पद्धतीने केलं जातं त्यामुळे त्यात राजकीय संदर्भ शोधण्याचे कारण नाही, त्याकडे हलक्या फुलक्या पद्धतीनेच बघितले पाहिजे वक्तव्याचे अधिक स्पष्टीकरण नितीन गडकरीच देऊ शकतील, असे त्यांनी सांगितले.