डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात रविवारी प्रसूतीसाठी आलेल्या रुग्णांना दाखल करून न घेता परत पाठविले
मनसेने घेतली आयुक्तांची भेट……
डोंबिवली : स्मार्ट सिटी योजनेत समावेश झालेल्या कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात दोन मोठी रुग्णालये आहेत .मात्र या रुग्णालयात अत्यावश्यक सोयी सुविधा ,तंत्रज्ञ आणि तज्ञ डॉक्टर्स यांची कमतरता असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे .डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात रविवारी प्रसूतीसाठी आलेल्या रुग्णांना दाखल करून न घेता परत पाठविले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे . त्यामुळे पालिकेच्या रूग्णालयांचा सर्वसामान्यांना उपयोग काय? असा सवाल मनसेच्या शिष्टमंडळाने विचारला आणि डॉक्टर लवांगरे यांना हटवण्याची मागणी केली आहे.
कल्याणमध्ये २०० बेडसची क्षमता असणारे रुक्मिणीबाई रुग्णालयाच आहे .तळ अधिक दोन मजली असलेल्या या रुग्णालयात तळ मजल्यावर बाह्यरुग्ण विभाग ,एक्स – रे विभाग,सोनोग्राफी ,प्रयोगशाळा ,औषधालय आहे .पहिल्या मजल्यावर स्त्री रोग ,बाल रुग्ण ,प्रसूती ,नवजात शिशु ,क्षय रोग निवारण व जनरल विभाग तसेच ब्लड बँक आहे .मात्र या रुग्णालयात तज्ञ डॉक्टर्स व इतर तांत्रिक स्टाफ यांची कमतरता असल्याने येथे गंभीर आजारी असलेल्या रुग्णांवर उपचार होत नाहीत .गंभीर जखमी रुग्णावर मोठ्या शस्त्रक्रिया देखील होत नसल्याने अनेकदा असे रुग्ण ठाणे वा मुंबईच्या रुग्णालयात हलविण्यात येत असतात .
डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयाची सुद्धा तशीच अवस्था आहे . तळ अधिक दोन मजली रुग्णालयात तज्ञ डॉक्टर्स आणि तांत्रिक स्टाफ यांची उणीव असल्याने हे रुग्णालय सुद्धा मोठ्या घराचे पोकळ वासेच ठरले आहे .बाह्य रुग्ण विभागात प्रतिदिन सुमारे ५०० ते ६०० पेक्षा अधिक रुग्ण तपासणीसाठी येत असतात .गंभीर रुग्णांना अनेकदा पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालय किंवा ठाणे – मुंबईच्या रुग्णालयात पाठविले जाते . डोंबिवली पूर्वेतील सुतिकागृह इमारत जीर्ण झाल्याने सुतिकागृह बंद करण्यात आल्याने रुग्णांच्या गैरसोयीत आणखी भर पडली आह. रविवारी बाळंतपणासाठी एका महिलेला शात्रीनगर रुग्णालयात नेण्यात आले .मात्र एवढ्या मोठ्या रुग्णालयात रविवारी डॉक्टर्स नसल्याचे सांगून परत पाठविण्यात आले .डॉक्टर्सची कमतरता असल्याने रविवारी नवीन रुग्ण दाखल करून घेतले जात नसल्याचे सांगण्यात आल्याची धक्कादायक माहिती मनसेचे शहरअध्यक्ष मनोज प्रकाश घरत यांनी दिली .सदर प्रसंगी उर्मिला तांबे,स्वाती कदम,जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर,उल्हास भोईर,प्राजक्त पोतदार उपस्थित होते.