घारापुरी (एलिफंटा) बेटाच्या विद्युतीकरणाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कौतुक
देशात प्रथमच अत्याधुनिक तंत्रज्ञनाचा वापर करून घारापुरी (एलिफंटा) बेटाचे यशस्वीरित्या विद्युतीकरण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात विद्युतीकरणाचे काम करणाऱ्या प्रशासनाचे आणि घारापुरीतील जनता यांचे कौतुक केले आहे.
महावितरणने घारापुरी बेटाच्या विद्युतीकरणासाठी देशात प्रथमच समुद्र तळाखालून सर्वात लांब 7.5 कि.मी. केबल टाकली. या विद्युतीकरणाचे लोकार्पण नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारी इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घारापुरी बेटाच्या विद्युतीकरणाची दखल आपल्या ‘मन की बात’ या लोकप्रिय कार्यक्रमात दि. 25 फेब्रुवारी 2018 रोजी घेतली असून त्याआधारे व्टिट केले आहे. त्यात सात दशकानंतर एलिफंटा बेटाचे विद्युतीकरण झाल्याबद्दल तेथील जनता व प्रशासनाचे कौतुक करताना ‘जनतेचे जीवन प्रकाशमय होण्यापेक्षा आणखी कोणते मोठे सुख व समाधान असेल’, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे.