कल्याण रेल्वे स्थानकाची अस्वच्छता पाहून खासदार कपिल पाटील नाराज
डोंबिवली दि.२७ – भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी मंगळवारी कल्याण रेल्वेस्थानकाची पाहणी केली. रेल्वे स्थानकाची अस्वच्छता पाहून खासदार कपिल पाटील यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना झापले. यावेळी आमदार नरेंद्र पवार, उपमहापौर उपेक्षा भोईर, शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, वरुण पाटील, अर्जून भोईर आदी उपस्थित होते. रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म, आरक्षण केंद्र, तिकीट केंद्र, बंद पडलेल्या एटीव्हीएम मशीन, स्वच्छतागृहे, तिकीट तपासनीस कार्यालय आदींची पाहणी करुन रेल्वे प्रवाशांशी संवाद साधला. १५ दिवसांनंतर आपण पुन्हा रेल्वे स्थानकाचा दौरा करणार असल्याचेही खासदार पाटील यांनी यावेळी सांगितले.
कल्याण रेल्वे स्थानकातील स्कायवॉकवरील वाढते फेरीवाले व दुरवस्थेबद्दल यावेळी खासदार पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी तातडीने महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांच्याबरोबरच रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधून फेरीवाल्यांना हटविण्याची सुचना केली. तसेच स्कायवॉकच्या दुरुस्तीची सुचना केली. कोणत्याही परिस्थितीत प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याची सुचनाही त्यांनी केली. रेल्वे तिकीटगृहातील ३० पैकी १० एटीव्हीएम मशीन बंद असल्याबद्दल खासदार पाटील यांनी संताप व्यक्त केला. त्याचबरोबर तातडीने दुरुस्तीची सुचना केली. खासदार पाटील यांनी रेल्वे प्रवाशांशीही संवाद साधला असता प्रथम वर्गातील प्रवाशांनी डब्यात विनातिकीट प्रवाशी येत असल्याची तक्रार प्रवाशांनी केली. रेल्वे टीसींकडून तपासणी होत नसल्याने दिवसेंदिवस फुकट्या प्रवाशांचे प्रमाण वाढत असल्याबद्दल प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. रेल्वे ट्रॅकमधील कचरा, दरवाजात उभ्या प्रवाशांची दांडगाई आदी तक्रारीही प्रवाशांनी केल्या. त्यानंतर खासदार यांनी तिकीट तपासनींच्या कार्यालयाला भेट देऊन प्रथम वर्गाच्या डब्यात तपासणी वाढविण्याची सुचना केली. या वेळी तिकीट तपासनीसांकडून कार्यालयाची दुरवस्था झाल्याकडेही लक्ष वेधण्यात आले. आरक्षण केंद्रामध्ये तत्काळ तिकीटाच्या आरक्षणाचे टोकन मिळविण्यासाठी पहाटे चारपासून रांग लावावी लागत असल्याची प्रवाशांनी सांगितल्यावर खासदार पाटील यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर सुमारे तासभर आधी टोकन देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी संपूर्ण मुंबई विभागात केली जाणार आहे. आरक्षण केंद्राच्या परिसरातील दलालांना हटविण्याची सुचनाही खासदार पाटील यांनी केली.