आस्थापनांनी अग्निसुरक्षेसंबंधी वेळीच ठोस उपाययोजना कराव्यात ; आयुक्त पी.वेलरासू
कल्याण – मुंबई येथील कमला मिल कंपाउंडमध्ये घडलेल्या अग्निदुर्घटना व त्यातून झालेल्या जिवीत हानीच्या अनुषंगाने आयुक्त पी.वेलरासू यांनी अशाप्रकारची अनुचित घटना महापालिका क्षेत्रात होवु नये, म्हणून महापालिका क्षेञातील सर्व हॉटेल, रेस्टॉरंट, पब्लिक असेंब्ली प्लेस, रुग्णालये, शैक्षणिक संस्था यांचे अग्निसुरक्षेच्या दृष्टीने प्रभाग अधिकारी, परवाना विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग यांचे प्रतिनिधी आणि अग्निशमन विभाग यांना संयुक्तपणे तपासणी करण्याचे आदेश दिले होते. उपरोक्त आदेशानुसार सदर संयुक्त पथकाकडून आतापर्यंत महापालिका क्षेञातील 740 आस्थापनांची तपासणी करण्यात आली असून, त्यातील 246 आस्थापनांनी अग्निसुरक्षा उपाययोजनांची पुर्तता केलेली असल्याचे पाहणीदरम्यान आढळून आले आहे.
याशिवाय 347 आस्थापनांमध्ये अशंतः अग्निसुरक्षा व्यवस्था असल्याचे दिसून आले असुन, त्यांना ती पुर्ण करुन घेण्याचे निर्देश दिले आहेत. उर्वरित 163 आस्थापनांमध्ये कोणत्याही प्रकारची अग्निसुरक्षा उपाययोजना केलेली नसल्याचे तपासणी पथकास आढळून आले आहे.
ज्या आस्थापनाधारकांनी अग्निसुरक्षा उपाययोजनांची पुर्तता केलेली नाही, त्यांना महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना 2006 च्या कलम 6 अन्वये नोटीस पाठविण्याची कार्यवाही करुन त्याची विहीत मुदतीत पुर्तता करुन घेण्याचे निर्देश आयुक्तांनी दिलेत. सदर नोटिसव्दारे संबधित आस्थापनाधारकांनी 7 दिवसात आग प्रतिबंधक उपाययोजनांचे काम हाती घ्यावयाचे आहे. नोटिशीचे पालन न केल्यास कलम 8 (क) नुसार वीज व पाणी पुरवठाकरिता जबाबदार असलेल्या प्राधिकरणास वीज किंवा पाणी पुरवठा खंडीत करण्याचे निर्देश देण्यात येतील. त्यानंतरही आवश्यक आग प्रतिबंधक उपाययोजनांचे काम हाती घेतले नाही तर, कलम 8 (ख) नुसार त्या क्षेञाकरिता असलेल्या पोलीस अधिका-यांना इमारतीतील रहिवाश्यांना हलविण्याचे निर्देश देण्यात येतील. सबंधित जागा रिकामी झाल्यानंतर कलम 8 (3) अन्वये पोलीस अधिका-यांकडून सदर जागा सिलबंद करण्याची कार्यवाही करण्यात येईल, याची सर्व आस्थापनाधारक व नागरिकांनी नोंद घ्यावी, असेही कळविण्यात येते. सदरची तपासणी व त्या अनुषंगिक कार्यवाही ही केवळ अग्निसुरक्षा उपाययोजनांसंदर्भात असून, ती यापुढेही सुरु राहणार आहे.
Please follow and like us: