आप प्रेस नोट : साक्री (धुळे) येथील अमानुष हत्याकांडच्या निषेध व मागण्या
मागील काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात मुले पळविणारी टोळी आली आहे, अशी अफवा पसरवण्यात आली आहे. गावातील नागरिक बाहेरून येणाऱ्या नवीन लोकांना बेदम मारहाण करून जीवानिशी मारत आहे. या प्रकरणात गावोगावी फिरून काम करणारे ,भिक्षा मागणारे ,कचरा गोळा करणारे आणि मुख्यत्वे भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना जाणीवपूर्वक लक्ष केले जात आहे. नाथपंथी डवरी गोसावी हा समाज सोलापूर जिल्ह्यातून दरवर्षी पोटाची खळगी भरण्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात जात असतात, त्यातीलच धुळे जिल्ह्यात या समाजातील काही लोक १ जुलै २०१८ रोजी साक्री तालुक्यातील पिंपळनेर पोलीस स्टेशन च्या हदीतील राइन पाडा या गावात भिक्षा (माधुकरी) मागण्यासाठी गेलेल्या लोकांना मुले पळवणारी टोळी आल्याची समजून कुठल्याही प्रकारची शाहनिशा व चौकशी न करता गावकऱ्यांनी या पाच लोकांना अतिशय क्रूर व मानवतेला काळीमा फासत तरुणांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत या पाचही लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आम आदमी पार्टी या हत्याकांडाचा निषेध करीत आहे.
देशभरात गेल्या काही वर्षात परंपरागत व्यवसाय बंद होत असताना इतर रोजगार उपलब्ध नसणे, नवीन कौशल्य अवगत करण्यासाठी सुविधा नसणे, जात पडताळणीमध्ये अनंत अडचणी , रेशन कार्ड न मिळणे अश्या अनेक अडचणीमुळे भटके, विमुक्त समाज सामाजिक दृष्टया अधिकाधिक वंचित होतो आहे. भटके विमुक्त समाजाच्या पुनर्वसनासाठी ठोस कार्यक्रम आखण्याची गरज आहे. त्यामुळे आम आदमी पार्टी शासनाकडे पुढील मागण्या करीत आहे.
प्रमुख मागण्या
१.ज्यांनी नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या पाच जणांची अमानुष हत्या करण्यात आली त्यांच्यावर कडक व कठोर कारवाई करण्यात यावी. पिडीतांच्या प्रत्येक कुटुंबांना १० लाख रुपये व शासकीय नौकरी देऊन त्यांचे पुनर्वसन करावे.
२.सोशल मिडियावर अफवा पसरवणाऱ्यावर त्वरित गुन्हे दाखल करण्यात यावेत.
३.भटक्या विमुक्तांना उपजीविकेचे साधन म्हणून शेतजमीन , शेतीपुरक व्यवसाय व राहायला हक्काचे घर देऊन पुनर्वसन करण्यात यावे. भटके विमुक्त जमातींना त्वरित ओळखपत्र व कायद्याचे संरक्षण मिळावे.
४.पोलिस व गृहखात्याच्या नाकर्ते पणामुळे ही महाराष्ट्राला लज्जास्पद घटना घडली असल्याने मा देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा व सक्षम, स्वतंत्र गृहमंत्री नेमावा.
-आम आदमी पार्टी, महाराष्ट्र