बापाने आपल्या पोरासाठी जे कराव ते पवार साहेबांनी माझ्यासाठी केलं- जितेंद्र आव्हाड
{म.विजय}
ठाणे दि.०३ :- हजारो लोकांचा सहभाग, जनसामान्यांकडून ठिकठिकाणी केले जाणारे स्वागत, ढोल-ताशांचा निनांद आणि कार्यकर्त्यांचा उत्साह अशा जोशपूर्ण वातावरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी रणरणत्या उन्हात एखाद्या तरुणाला लाजवेल, असा जोश दाखवित सुमारे 3 तासांपेक्षा अधिक काळ प्रचाररथावर स्वार होऊन जितेंद्र आव्हाड यांच्या उमेदवारी रॅलीचे सारर्थ्य केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून तिसर्यांदा अर्ज भरला. दोनवेळा आमदार म्हणून प्रचंड मतांनी चढत्या क्रमाने याच मतदारसंघातून आव्हाड हे विजयी झाले आहेत. यावेळी तेच हॅटट्र्ीक साधणार असल्याचे स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे त्यांच्या या हॅटट्रीकला शुभेच्छा देण्यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे आव्हाड यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी स्वतः जातीने हजर राहिले होते.
हेही वाचा :- राज ठाकरेंचा खंदे समर्थक समजले जाणारे नितीन नांदगावकर यांचा शिवसेनेत प्रवेश
जितेंद्र आव्हाड या आपल्या वैचारिक वारसदारासाठी शरद पवार ठाण्यात आल्याचे बोलले गेले. मागील दोन निवडणुकीत सह्याद्री शाळेत निवडणूक कार्यालय होते. मात्र यावेळी हे केंद्र मुंब्रा-कौसा स्टेडियममध्ये हे कार्यालय स्थलांतरीत करण्यात आले आहे. त्यामुळे नियमितपणे कळवा नाका येथील शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून निघणारी रॅली यंदा रेतीबंदर येथील शिव, जिजाऊ,शाहू,फुले, सावित्रीबाई, आंबेडकर यांच्या चित्रशिल्पाला पुष्पहार अर्पण करून शरद पवार यांनी सुरू केली. त्यानंतर मुंब्रा रेल्वे स्थानक येथील दत्तुवाडी येथुन जितेंद्र आव्हाड यांची रथयात्रा प्रत्यक्षात 11.30 वाजता शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्या जयघोषात निघाली. या रथावर जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत भरऊन्हात स्वतः शरद पवार तसेच पुरोगामी विचारांचे वाहक म्हणून गणले जाणारे कन्हैय्या कुमार हे सहभाग सहभागी झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये विलक्षण उत्साह निर्माण झाला होता. शरद पवार आगे बढो, हम तुम्हारे साथ है , कोण आला रे कोण आला, राष्ट्रवादीचा वाघ आला. , शरद पवार झिंदाबाद, जितेंद्र आव्हाड झिंदाबाद आदी जोरदार घोषणा कार्यकर्ते देत होते. ढोलताशांच्या गजरात, वाजत गाजत, गगनभेदी घोषणांच्या तालासुरात रॅली कौसा स्टेडियम येथील कळवा-मुंब्रा प्रभाग कार्यालयात दाखल झाली.
हेही वाचा :- 20 ओक्टोंबर रोजी वाशीमध्ये वीरशैव वधुवर मेळावा.
यानंतर शरद पवार यांच्या उपस्थितीतच जितेंद्र आव्हाड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे, प्रदेश सरचिटणीस तथा ठामपाचे गटनेते नजीब मुल्ला, प्रदेश चिटणीस तथा ठाणे शहर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार सुहास देसाई, महिला अध्यक्षा सुजाता घाग, युवक अध्यक्ष मोहसीन शेख, कळवा-मुंब्रा विधानसभाध्यक्ष शमीम खान, युवाध्यक्ष शानू पठाणे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ऐका बापाने आपल्या पोरासाठी जे करावं; ते पवार साहेबांनी माझ्यासाठी केलं, एका कार्यकर्त्यासाठी वयाच्या 80 व्या वर्षी काय-काय करतो हा माणूस. हे आज अख्या महाराष्ट्राला कळलं. ज्यांनी-ज्यांनी पवार साहेबांना मागच्या दोन महिन्यात त्रास दिलाय त्यांना ही जनता सोडणार नाही, शरद पवार यांचा जो छळ केलाय; त्याचा बदला महाराष्ट्रातील तमाम आया,बहिणी आणि तरुणवर्ग घेईल,एका कार्यकर्त्यावर पवारसाहेब किती प्रेम करतात; याचे ज्वलंत उदाहरण महाराष्ट्राला कळल आहे, अशा शब्दात आ. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या भावना व्यक्त करताना त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.