बारवी धरणाचे सर्व दरवाजे उघडले
बदलापूर दि.०५ : बारवी धरणाची उंची यंदा चार मीटरने वाढविण्यात आली होती. ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणाचे सर्व दरवाजे रविवारी उघडण्यात आले. धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे हे धरण सकाळी ९ वाजता भरून वाहण्यास सुरुवात झाली. पूर्वी धरणाची पाण्याची पातळी ही ६८.६० मीटर एवढी होती. या जुन्या पातळीनुसार धरणात २३० एमसीएम एवढा पाणीसाठा बारवीत होत होता. यंदा या धरणाची उंची चार मीटरने वाढविली आहे. सोबतच या धरणावर स्वयंचलित दरवाजेही बसविले आहेत. त्यामुळे या धरणाची पाण्याची पातळी ७२.६० मीटर एवढी झाली आहे.
हेही वाचा :- जिंकण्याचा विश्वास आहे तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायला काय हरकत ; राज ठाकरे
प्रथमच हे धरण वाढीव उंचीनुसार भरण्यास सुरुवात करण्यात आली. धरणात ३४० एमसीएम पाणीसाठा निर्माण झाला आहे. धरणावर बसविलेल्या ११ स्वयंचलित दरवाजांपैकी गेट नंबर ४ सकाळी ९ वाजता उघडण्यास सुरुवात झाली. त्यानंतर, दोन तासांतच धरणाचे सर्व दरवाजे उघडले. धरण क्षेत्रात पाऊस जास्त झाल्याने, धरणातून २५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. बारवी धरण भरल्याने धरणातून होणाºया पाण्याचा विसर्ग हा मोठा आहे. त्यामुळे हे सर्व पाणी बारवी नदीमार्गातून उल्हास नदीला मिळणार आहे. त्यामुळे उल्हास नदी आणि बारवी नदी ज्या भागात मिळते, त्याच्यापुढे असलेल्या कल्याण ग्रामीण भागाला सर्वात मोठा फटका सहन करावा लागणार आहे.