१४ गावांमधील पाणीटंचाई अडिच कोटी रुपये खर्च करून मुख्य पाइपलाइनच्या दुरुस्तीचे निर्देश
ठाणे – नवी मुंबई महापालिकेतून वगळलेल्या १४ गावांमधील पाणीटंचाई दूर करण्यासाठी कल्याण फाटा ते दहिसर फाटा पर्यंतच्या जुन्या पाइपलाइनची तातडीने दुरुस्ती करून आवश्यक ठिकाणी नवे पाइप टाकण्याचे निर्देश ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिले. या १४ गावांसाठी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून जानेवारी २०१४ मध्ये ६ कोटी ४२ लाख रुपयांचे काम मंजूर झाले होते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या प्रकल्पाची अमलबजावणी करत होते. मात्र, अत्यंत कूर्मगतीने काम सुरू असल्यामुळे या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे गेली पाच वर्षे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. मजिप्राकडून १२.४५ कोटींचा पूरक आराखडा राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. सध्या या प्रस्तावाची पडताळणी सुरू आहे. या गावांमधील पाणीपुरवठ्यासाठी सन १९९८-९९ मध्ये नवी मुंबई महापालिकेने टाकलेली कल्याण फाटा ते दहिसर फाटा पाइपलाइन जीर्णावस्थेत आहे.
हेही वाचा :- नवी दिल्ली येथे 21-23 फेब्रुवारी 2019 दरम्यान चौथी भारत-आसियान परिषद आणि प्रदर्शन
पाण्याच्या दबावाने वारंवार ही पाइपलाइन विविध ठिकाणी फुटते. त्यामुळे गावांना वारंवार तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. ही पाइपलाइन नव्याने टाकण्यासाठी मजिप्राने २ कोटी ३५ लाख रुपयांचा प्रस्ताव शासनाला सादर केला होता. मात्र, तो निर्धारित वेळेत सादर न केल्यामुळे शासनाने फेटाळला. त्यामुळे आता मूळ योजनेतील शिल्लक असलेल्या अडिच कोटी रुपयांचा निधी वापरून कल्याण फाटा ते दहिसर फाटा पाइपलाइन तातडीने दुरुस्त करण्याचे, तसेच आवश्यक तिथे नवे पाइप टाकण्याचे निर्देश पालकमंत्री श्री. शिंदे यांनी बुधवारी मंत्रालयातील त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत मजिप्राच्या अधिकाऱ्यांना दिले. याप्रसंगी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मजिप्राच्या अधीक्षक अभियंत्या मनीषा पालांडे, डीआरडीएच्या प्रकल्प अधिकारी श्रीमती सातपुते, जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंते, जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, विभागप्रमुख गणेश जेपाल, शाखा प्रमुख किसन पाटील, पंचायत समिती सदस्य किरण ठोमरे व मजिप्राचे अन्य अधिकारी उपस्थित होते.