दहावीचा पळालेला विद्यार्थी कल्याण रेल्वे स्टेशनवर सापडला
कल्याण दि.२६ – दहावीची परीक्षा जवळ आलीय. तू अभ्यास का करीत नाहीस, असे संभाजीनगरातील गाजगाव येथे राहणाऱ्या सागर शिरसाठ याला त्याच्या आईने खडसावून विचारले. त्यावर थोडी बाचाबाची झाली आणि घरातून रागावून तो पळाला. त्याने थेट संभाजीनगर रेल्वे स्टेशन गाठले व नंदीग्राम एक्सप्रेसने तो कल्याण रेल्वे स्थानकात उतरला. फलाटावर फिरत असतानाच पोलिसांनी त्याला हटकले. त्याची चौकशी केली तेव्हा आपण घरातून पळून आल्याची कबुली त्याने दिली.
हेही वाचा :- पंतप्रधानांनी हिमाचल प्रदेशच्या जनतेला राज्य स्थापनदिनानिमित्त दिल्या शुभेच्छा
मात्र रेल्वे पोलिसांनी फोनवरून त्याच्या पालकांशी संपर्क साधला आणि मोठया प्रयत्नाने सागरला त्याच्या आईवडिलांच्या स्वाधीन केले. पळालेला मुलगा 24 तासांत सापडल्याचा आनंद पालकांच्या चेहऱ्यावर दिसत होता. सागर शिरसाठ हा गाजगाव येथील ज्ञानमंदिर विद्यालयात शिकतो. त्याला एकूण तीन भावंडे असून आई शोभा ही मोलमजुरी करते, तर वडील महेंद्र शिरसाठ हे दिव्यांग असून घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. दहावीची प्रीलियम परीक्षा सुरू होत असल्याने आईने अभ्यासाकडे लक्ष दे, टंगळमंगळ करू नको अशा शब्दांत खडसावले होते.