सिग्नल शाळेतून दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी शिवसेनेची
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला मोहन काळे, दशरथ पवार यांचा सत्कार
ठाणे – रस्त्यावरील शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ठाणे महापालिकेने सुरू केलेल्या सिग्नल शाळेच्या अभूतपूर्व प्रयोगाला यश येत असून सिग्नल शाळेच्या माध्यमातून यंदा प्रथमच दहावीच्या परीक्षेला बसलेले दोन विद्यार्थी उत्तम गुणांसह उत्तीर्ण झाले आहेत. मोहन काळे याला ७६ टक्के आणि दशरथ पवार याला ६४ टक्के मिळाले असून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दोघा विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांचा सत्कार केला. तसेच, या विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवून देण्यासह पुढील शिक्षणाची जबाबदारी शिवसेना उचलेल, अशी ग्वाहीही शिंदे यांनी यावेळी दिली.
सिग्नलवर भीक मागणाऱ्या किंवा किडुकमिडुक विकून गुजराण करणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ठाणे महापालिका आणि समर्थ भारत व्यासपीठ ही सेवाभावी संस्था यांनी तीन हात नाका येथील उड्डाणपुलाच्या खाली सिग्नल शाळा सुरू केली. देशातील हा अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग होता. शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काय करावे, या प्रश्नी केंद्र आणि राज्य सरकारे चाचपडत असताना ठाणे महापालिकेने मात्र हा अभूतपूर्व प्रयोग यशस्वीरित्या राबवला असून या शाळेच्या माध्यमातून यंदा प्रथमच दोन विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते.
मोहन काळे याला आयटीआय मधून तंत्रप्रशिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे, तर दशरथ पवार याला पोलिस दलात जाण्याची इच्छा आहे. या दोघांशी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला; तसेच त्यांना पेढा भरवून त्यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी समर्थ भारत व्यासपीठचे भटु सावंत आणि सिग्नल शाळेला मदत करणारे दिग्दर्शक विजू माने यांचाही शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
अक्षरओळखच नव्हे, तर नागर संस्कृतीशीही फारसा परिचय नसलेल्या या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे शिवधनुष्य उचलण्यापेक्षा कमी अवघड नव्हते. सिग्नल शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांना या विद्यार्थ्यांना सुरुवातीला केवळ शिकवण्याचेच नव्हे, तर प्रसंगी आंघोळ घालून तयार करण्याचे कामही करावे लागले. ही मुले दिवसभर छोटीमोठी कामे करून किंवा प्रसंगी भीक मागून घर चालवण्यासाठी हातभार लावत; त्यामुळे त्यांना शाळेत पाठवण्यासाठी त्यांच्या आईवडलांना राजी करणे हे देखील अतिशय अवघड होते. अशा सर्व आव्हानांचा मुकाबला करत ठाणे महापालिका, समर्थ भारत व्यासपीठचे भटु सावंत आणि आरती परब, सुप्ती मुखर्जी, सुप्रिया कर्णिक, अश्विनी औंधे, चारुलता देशमुख, संचिता धनावडे, ठाणे मनपाच्या १९ क्रमांक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती लोहकरे, सिंघानिया शाळेच्या पौर्णिका करंदीकर, आदर्श विद्यामंदिर, बदलापूर येथील ज्योती जावळे, स्वरुपा बोजेवार, सुमन शेवाळे, श्रद्धा दंडवते, दुर्गा खुरकुटे आदी शिक्षिकांनी सिग्नल शाळेला हे यश प्राप्त करून दिले.