शिर्डीवरून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, अपघातात २ जण जागीच ठार
मुरबाड:- कल्याण-अहमदनगर महामार्गावरील ओतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन कारध्ये समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात शिर्डीवरून घरी परतणारे मुरबाडमधील दोन तरुण जागीच ठार झाले आहेत. तर तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. सुशांत देशमुख व अरविंद चौधरी अशी मृतांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुरबाड तालुक्यातील तळेगाव व फागणे येथील सुशांत देशमुख व अरविंद चौधरी हे दोघे आपल्या तीन मित्रांबरोबर शिर्डी येथे दर्शनासाठी गेले होते. ते पुन्हा आपल्या गावी सकाळच्या सुमाराला येत होते. ओतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील कोळवाडी येथे आळेफाट्याच्या दिशेने जाणाऱ्या झायलोने त्यांच्या स्वीफ्टला जोरदार धडक दिली. या धडकेत सुशांत देशमुख व अरविंद चौधरी हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत कारमध्ये असलेले शाम शिवाजी देशमुख, रोशन चौधरी व प्रकाश संभाजी देशमुख हे गंभीर जखमी झाले.
जखमींना तातडीने आळेफाटा येथे दाखल करण्यात आले होते. मात्र त्याठिकाणी प्राथमिक उपचार करून त्यांना घोटी जवळील एस. एम. बीटी. (धामणगाव) या रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताचा अधिक तपास टोकवडे पोलीस करीत आहेत.
मुरबाड ते कल्याण महामार्ग बनलाय मृत्युचा सापळा
धक्कादायक बाब म्हणजे कोट्यवधी रुपयांचा निधी कल्याण ते मुरबाड या महामार्गावर खर्च केल्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग दरवर्षी जाहीर करते. तरीही कल्याण – नगर महामार्गावर वारंवार अपघात होऊन नागरिकांचे बळी जातात. त्यातच मुरबाड ते कल्याण हा ३० किलोमीटर अंतराचा रस्ता चालकासाठी अधिकच धोकादायक ठरत असून सध्या हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्याकडे संबधित विभागाने लक्ष देऊन होणाऱ्या अपघाताला आळा घालावा अशी मागणी नागरिक करीत आहेत.