राज्यातील बेरोजगारांसाठी एक फारच आनंदाची बातमी,सरकार ३६ हजार पदे भरणार
एकुण ७२ हजार पदे रिक्त, दोन टप्प्यात पदे भरणार
मुंबई – राज्यातील बेरोजगारांसाठी एक फारच आनंदाची बातमी आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील विविध खात्यांतील ३६ हजार रिक्तपदे भरण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे अनेक बेरोजगारांना रोजगाराची संधीच निर्माण होणार असून तरुण वर्गासाठी ही मत्वाची बाब ठरणार आहे.
राज्यात विविध खात्यात ७२ हजार पदे रिक्त असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनातील चर्चेला उत्तर देताना सांगितलं होतं. ही पदे दोन टप्प्यात भरणार असल्याचं आश्वासनही त्यांनी दिलं होतं. यंदा पहिल्या टप्प्यात ३६ हजार तर दुसऱ्या टप्प्यात पुढच्या वर्षी ३६ हजार पदे भरण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले होते. या जागा भरताना ग्रामीण भागातील प्रशासकीय यंत्रणेचे सक्षमीकरण करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. विशेषत: कृषी आणि ग्रामविकासाशी संबंधित विविध विभागांतील रिक्त पदे अग्रक्रमाने भरण्यात येतील. तसेच ग्रामीण भागातील विविध पायाभूत आणि जीवनावश्यक सुविधा देण्यातही अडचणी येत असल्याने कृषी आणि ग्रामविकासाशी संबंधित रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यंदा पहिल्या टप्प्यात भरण्यात येणाऱ्या ३६ हजार पदांमध्ये ग्रामविकास विभागातील ११ हजार ५ पदे, सार्वजनिक आरोग्य विभागातील १० हजार ५६८ पदे, गृह विभागातील ७ हजार १११ पदे, कृषी विभागातील २ हजार ५७२ पदे, पशुसंवर्धन विभागातील १ हजार ४७ पदे, सार्वजनिक बांधकाम विभागातील ८३७ पदे, जलसंपदा विभागातील ८२७ पदे, जलसंधारण विभागातील ४२३ पदे, मत्स्यव्यवसाय विकास विभागातील ९० या पदांसह नगरविकास विभागातील १ हजार ६६४ पदांचा समावेश आहे. शासनाच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील प्रशासकीय यंत्रणेचे बळकटीकरण होणार असून त्यासोबतच युवकांना रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध होणार आहेत.