मोखाडा तालुक्यातील ४० गावातील शौचालये पाण्याविना बंद…
गावात भीषण पाणीटंचाई
(श्रीराम कांदु)
डोंबिवली- `महाराष्ट्र राज्य हगणदारीमुक्त`असे म्हणत स्वतःची पाठ थोपवून घेतली असली तरी पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील ४० ते ४५ गावात शौचालये पाण्याविना बंद झाली आहे. गावात भीषण पाणी टंचाई असून टॅकरने पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे या गावात `अच्छे दिन` कधी येणार असा प्रश्न येथील गावकऱ्यांना पडला आहे. डोंबिवली पत्रकार संघाच्या वतीने मोखाडा तालुक्यातील गावातील काही गावांचा पाहणी दौऱ्यात येथील परिस्थितीची माहिती घेण्यात आली.
मोखाडा तालुक्यातील ४५ गावांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असून येथील आदिवासी पाड्यांना टॅकरने पाणी पुरवठा केला जातो. ये पाणी गावतील विहिरीत सोडले जाते. विहिरीतील पाणी आणण्यासाठी गावकरी एक ते दोन किलोमीटरचे अंतर चालावे लागते. या गावात शासनाने शौचालये बांधली असली तरी गावात पिण्याचे पाणी मिळत नाही त्याचा वापर करत नसल्याचे येथील आदिवासी बांधवांनी सांगितले. परिवर्तन महिला संस्था मोखाडा तालुक्यातील ७० गावात काम करत आहे. येथील तरुणवर्ग रोजगारासाठी गाव सोडून जात आहे. या तरुणांना गावातच रोजगार मिळावा म्हणून आणि त्यांचे स्थलांतर थांबावे , गावाचा विकास व्हावा यासाठी संस्थेच्या अध्यक्षा ज्योती पाटकर यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन महिला संस्था प्रयत्न करत असल्याचे वर्षा परकुरे यांनी सांगितले. नीळमातील पाडा येथील चंदर दळवी या तरुणाने गाव न सोडता गावतील तरुणांना स्पर्धा परीक्षेत बसा, गाव सोडून नका जाऊ यासाठी मार्गदर्शन करत असतो. या गावात पाणी साठवण्यासाठी तळ बांधण्यात आले असून फक्त पावसाळ्यात याचा उपयोग होत असल्याचे चंदरने सांगितले. संस्थेतील भास्कर देवळे हा गावतील काम पाहत असतो. मोखाडा तालुक्यातील ४० गावात पाणी टंचाई असून प्रत्येक गावात दोन ते तीन कुपोषित बालके आहेत.