प्रेमाने शारीरिक संबंध ठेवले, मग बलात्कार कसा? : उच्च न्यायालय
पणजी – जर एखादी महिला आणि पुरुषांमध्ये दृढ प्रेम असल्याचा पुरावा असेल, तर त्यांच्यातील शारीरिक संबंधांप्रकरणी पुरुषाला बलात्काराचा दोषी ठरवता येणार नाही, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने नोंदविले आहे.
लग्नाच्या आमिषाने बलात्कार केल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने आरोपीला सात वर्षांचा कारावास आणि दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला. मात्र हायकोर्टाने ही शिक्षा स्थगित केली. कॅसिनोमध्ये काम करणारा आरोपी आणि तक्रारदार महिलेची २०१३ मध्ये ओळख झाली. ओळखीचे प्रेमात रुपांतर झाले. शेफ असलेल्या आरोपीने महिलेला कुटुंबीयांशी ओळख करुन देण्यासाठी घरी नेले. मात्र त्याच्या घरी त्यावेळी कोणीच नव्हते. तक्रारदार महिला त्या रात्री आरोपीच्या घरीच राहिली. दोघांमध्ये शारीरिक संबंध आले. दुसर्या दिवशी सकाळी आरोपीने तिला घरी सोडले. त्यानंतरही तीन ते चार वेळा दोघांमध्ये शरीरसंबंध आले. महिला कनिष्ठ जातीची असल्याचे कारण सांगून आरोपीने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला.
त्यानंतर महिलेने बलात्काराची तक्रार दिली. आरोपीने लग्नाचे वचन दिल्यामुळे आपण शारीरिक संबंध ठेवण्यास संमती दिल्याची कबुली तिने दिली. महिलेने आरोपीला आर्थिक पाठबळ दिल्याचेही समोर आले. पुरावे पाहता, शारीरिक संबंधांना दिलेली संमती ही केवळ लग्नाच्या वचनामुळे नाही, तर प्रेमसंबंधांमुळे होती. असे न्यायमुर्ती सी. व्ही. भडंग यांनी सांगितले. शारीरिक संबंधांनंतरही दोघांमध्ये रिलेशनशीप होती.
तक्रारदार महिला आरोपीला आर्थिक मदत करत होती आणि दोघांमध्ये तीन ते चार वेळा शारीरिक संबंध आले. त्याची परिस्थिती पाहता,तो महिलेवर दडपण आणून लैंगिक छळ करत होता, असे म्हणता येणार नाही.असेही न्यायमुर्ती भडंग यांनी स्पष्ट केले.