तीन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू
भिवंडी- तीन अल्पवयीन मुलींचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना भिवंडी तालुक्यातील कांबे ग्रामपंचायत हद्दीतील दहेलेपाडा या आदिवासी वस्तीत घडली आहे.या घटनेमुळे येथे हळहळ व्यक्त होत आहे.रोहिता रवी मांगत (वय १३) रसिका रवी मांगत (वय १२) व नीता असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलींची नावे आहेत त्या भिवंडीतील कांबे ग्रामपंचायत हद्दीतील दहेलेपाडा येथीलआदिवासी चैत्या फकाट यांच्या कुटुंबीयांसोबत राहत होत्या.
मृतक मुलींचे नातेवाईक मोलमजुरीसाठी लगतच्या भिवंडी शहरात गेले होते. त्यावेळी चैत्या फकाट यांची लहान मुलगी नीता आपल्या दोन भाचींसोबत रोहिता आणि रसिकासोबत खदानमधील डबक्यात साचलेल्या पावसाच्या पाण्यात अंघोळीसाठी गेल्या होत्या. ह्या तिघी पाण्यात उतरल्या असता नीता खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तीपाण्यात गटांगळ्या खाऊ लागल्याने रोहिता आणि रसिका या बहिणी आपल्या मावशीला वाचविण्याचा प्रयत्न करायला गेल्या. मात्र त्याही पाण्यात बुडू लागल्या. काठावरील लहान मुलांनी नीताच्या घरी जाऊन तिची आई सुकरीबाई हिला मुली बुडत असल्याची माहिती दिली. माहिती मिळताच नातेवाईकांनी डबक्याजवळ येऊन मुलींना वाचवण्यासाठी आजूबाजूला असलेल्या ग्रामस्थांना आरडाओरड करुन बोलावले. मात्र तोपर्यंत या तिन्ही मुली पाण्यात बुडाल्या होत्या. त्यानंतर सायंकाळी या तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले.दरम्यान रात्री नऊ वाजल्याच्या सुमाराला या घटनेची माहिती निजामपुरा पोलीस ठाण्यात न देताच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र अंत्यसंस्कार झाल्यावर या घटनेची माहिती पोलीस यंत्रणेला कळताच पोलीस अधिकारी व कर्मचारी आज सकाळी घटनास्थळी दाखल होत त्यांनी कुटुंबियांचे जाबजबाब नोंदविले असून घटनास्थळ आणि अंत्यसंस्कार स्थळाला भेट देवून पहाणी करत तपास सुरु केला आहे.