काँग्रेसनं पुकारलेल्या भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, शेकाप, डावे पक्ष, बसपा आणि पीपल रिपब्लिकन पक्षानं पाठिंबा दर्शवला
मुंबई, दि.१० – गेल्या 16 ते 17 दिवसांपासून देशाची जनता इंधन दरवाढीची झळ सोसतेय आणि याच इंधन दरवाढीविरोधात आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. काँग्रेसनं पुकारलेल्या भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, शेकाप, डावे पक्ष, बसपा आणि पीपल रिपब्लिकन पक्षानं पाठिंबा दर्शवला आहे. अंधेरी स्थानकात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोकल रोखण्यात आली. या आंदोलनानंतर अशोक चव्हाण, संजय निरुपम, माणिकराव ठाकरे यांना पोलिसांना ताब्यात घेतलं आहे.
इंधन दरवाढी विरोधातील भारत बंदला राज्यतही संमिश्र प्रतिसाद दिसून येत आहे. पुणे, नाशिक, मुंबई, नागपूर आणि औरंगाबादेत मनसे आणि काँग्रेस कार्यकार्ते आक्रमक दिसले. सिद्धीविनायक मंदिराबाहेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनसे कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. भारत बंद दरम्यान मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यावेळी त्यांनी जोरदार निदर्शनं केली. शेवटी आंदोलकांना आवरण्यासाठी नाईलाजाने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.
मुंबईमध्ये आयनॉक्स रघुलीला, कांदिवली पश्चिम, नक्षत्र दादर पश्चिम, दहिसर पूर्व, कांदिवली पूर्व, कार्निव्हल – संगम, कांदिवली पश्चिम, गोरेगाव पश्चिम हे संपूर्ण परिसर बंद आहेत. पुण्यात काँग्रेसने मंडई परिसरात घोडा गाडी आंदोलन केले अबकी बार पेट्रोल डिझेल शंभर पार अशी घोषणा देत काँग्रेस कार्यकर्ते घोडा गाडीत बसले.
काँग्रेस पक्षाने आज राहुल गांधींच्या नेतृत्वात रामलीला मैदानावर इंधन दरवाढीविरोधात एल्गार पुकारला. या धरणे आंदोलनात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह पक्षाचे सर्व नेते सहभागी झालेत. मित्रपक्षांपैकी शरद पवार, शरद यादव आणि आपचे संजय सिंहही या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी सर्व विरोधकांनी मोदी सरकारविरोधात वज्रमूठ आवळत राहुल गांधींच्या नेतृत्वात ऐक्याचं दर्शन घडवण्याचं प्रयत्नही केला. राहुल गांधींनी यावेळी सरकारवर सडकून टीका केलीय.